Pages

Friday, 16 October 2020

॥ विचारवेध॥ - झुंज मृत्यूशी

 


॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

झुंज मृत्यूशी ...


काळ आला होता पण .....


॥मरणाच्या दारावरती मी मृत्यूशी झुंजत होतो, 

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती 

कोरोनाच्या भयाण वेदना देहाला पिंजत होत्या ,

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती 

मनामध्ये विविधांगी विचारांचे काहूर माजले होते ,

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती ॥


'व्याधी' मग ती कोणतीही असो , माणसाचा जीव पिळवटून काढणारी असते . त्यातच सध्याच्या काळात कोरोनाचं भूत सगळ्यांच्या डोक्यावर घोंघावतयं . जो तो या कराल काळाच्या जबडयातून स्वतःला वाचवण्याची धडपड करीत आहे . पण लोकांच्यात राहून लोकांसाठी झटणाऱ्या माणसांना यापासून फार काळ दूर पळता येत नाही हेच खरं . त्यामुळं आजवर अनेकांच्या ऐकलेल्या कोरोनाच्या  कहाण्या प्रत्यक्ष अनुभवताना मात्र खूप विदारक वास्तव समोर ठाकलं होतं . पण लढण्याशिवाय पर्याय नव्हता . तसाही संघर्ष  आयुष्यात नवा नाही . पण संकट कितीही गंभीर असलं तरी खचून न जाता खंबीर मनाने सामना केला तर यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं हेच खरं . 

          संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले . सारं जग कोरोनाशी सामना करण्यात गेले दहा महिने व्यस्त आहे . भारतातही मार्चमध्ये शिरकाव झाला . सातारा जिल्हयात कोरोनाचा पहिला रुग्ण खंडाळ्यातच आढळला . आणि ज्याची भीती होती तेच समोर येऊन ठाकलं . 

   वास्तविक पहिल्यापासून समाजकार्याची कास धरलेली . लोकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण नेहमी कार्यरत रहावं हाच दृष्टीकोन कायम मनात ठेवलेला . त्यातच पत्रकारितेची आवड जोपासल्याने तालुक्यातील प्रत्येक गावाशी नाळ जोडलेली .  त्यामुळं बाहेर जबडा वासून काळ उभा आहे याची कल्पना असतानाही समाजसेवेचा पिंड कधी घरी बसू देत नव्हता . खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना त्याची बाधा आपल्या गावात होऊ नये . त्यामुळे गावातील लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने संपूर्ण गाव बंदी करणे , सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक औषध फवारणी करणे , लोकांना घराबाहेर पडू नका याच्या सूचना करण्यासाठी  दररोज सगळी गावं धडपडत होती . त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे , आरोग्य आणि महसूल प्रशासनाला मदत करणे , कुठल्याही गावातून कोणाचाही फोन आला तरी हाकेला धावून जाणे हा भाग क्रमप्राप्त होता . पण हे सगळं काळजी घेऊनच सुरू होतं . 

      लॉक डाऊनच्या काळात सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भटकंती करण्याचा छंद ही  जोपासला होता . एक ट्रेक पूर्ण केला तर पुढील महिनाभर एकदम तजेलदार वाटायचं . शिवाय ऐतिहासिक अभ्यासालाही मदत व्हायची .  त्यामुळे ते अधिक नेटाने चालू ठेवलं . दिवसागणिक पंचवीस तीस किलोमीटर डोंगरदऱ्या पालथा घालण्याची कायम सवय होती . 

  ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच काही दुःखदायक झाली . गुरुवार १ तारखेला माझ्या जीवलग मित्राच्या आईची तब्बेत अचानक बिघडली . कोरोनाचा काळ सुरु असल्याने इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळणे अवघड बनलयं. दिवसभर सर्व तपासण्या आणि उपचार शेवटी निरर्थक ठरले . आणि त्यांना देवाज्ञा झाली . हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का बसला . पण त्यातून सावरणे , त्याला धीर देणे आणि सर्व विधी पार पाडणे आवश्यक होते . तीन दिवस स्वब्धतेत गेले . 

     शनिवारी रात्री अंगात थोडी कणकण आणि ताप जाणवू लागला होता . घरीच पत्नी शलाकाने एक इंजेक्शन आणि औषधे दिली त्याने चांगला आराम पडला . पण रविवारी सकाळीच सहा वाजल्यापासून अंगात पुन्हा ताप भरू लागला . अंगदुखी वाढली . तातडीने रक्त तपासणी करून घेतली . तर प्लेटलेट कमी झाल्या होत्या . सीआरपी वाढला होता . लगेच घरी स्वतंत्र खोलीत सलाईन इंजेक्शन सुरू केले . आजाराची लक्षणे कोव्हिड सारखी भासू लागली होती . विनाकारण रिस्क घ्यायची नाही म्हणून सोमवारी सकाळी कोरोना चाचणी ( आरटीपीसीआर ) केली . पण दिवसभर अंगदुखी आणि ताप होताच . तीन चार दिवस अंग पिळवटून टाकणारी कणकणी आणि ताप यामुळे शरीराच्या रौंद्रारौंद्रातून असह्य वेदना उफाळून येत होत्या. पण सहन करण्यापलिकडे पर्याय नव्हता . उभ्या आयुष्यात एवढा त्रास कोणत्याच आजारात झाला नव्हता . मंगळवारी कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जरा धीर आला . ही अंगदुखी आणि ताप हळूहळू कमी होऊ लागली तशी फुफ्फुसाची ऑक्सीजन लेव्हल घसरू लागली . बुधवारी रात्री पर्यंत चांगली धाप लागू लागली . पहाडासारखा माणूसही या आजाराने कोसळू शकतो याची जाणीव झाली . त्यामुळे आणखी टेन्शन वाढलं . डॉ . हाडंबर यांनी एचआरसीटी करण्याचा सल्ला दिला . रात्री दहा वाजता माझे मित्र हिरालाल घाडगे यांना फोन करुन शिरवळला जोगळेकर हॉस्पीटलला संपर्क करायला लावला .डॉ कोरडे यांनीही पुढे कल्पना दिली . हिरा म्हणजे खरचं अष्टपैलू हिरा आहे . कोणतीही तमा न बाळगता माझ्या सोबत आले .

 सीटी स्कॅन मशीनमध्ये पहिल्यांदा झोपलो .

कसला तरी आवाज आला मशीन गरागरा डोक्याच्या व छातीच्या भोवती फिरू लागले . मनात विचार आला आपल्या आयुष्याची चक्र फिरू लागली वाटतं . पुन्हा आवाज आला . मशीन थोडं सरकलं . पण माझ्या डोक्यात विचारांचं वादळं . पण मग मिनिटाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मशीन वर सरकलं, आवाज आला . 'श्वास घ्या ...... ' मग मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला . पण पूर्ण क्षमतेने घेता येत नव्हता धाप लागत होती . पून्हा आवाज आला '  श्वास सोडा... पण हे ऐकण्यापूर्वी दोनदा घेऊन सोडून झालं होतं . ' असं दोन वेळा झालं . एकदाची मशीन वरुन खाली उतरलो . बाहेर कट्टयावर येऊन बसलो . दारातच हिरा मला क्रॉस करुन रुम मध्ये गेले . माझ्या अवताराने त्यांच्या लक्षात आलं नसावं . पण त्यांची नजर मला शोधत होती . हे मी ओळखलं . आणि आवाज दिला . त्यांनी घाबरू नका , लगेच उपचार घेऊया म्हणून धीर दिला .   

    सर्व तपासणी करून रात्री बारा वाजता माघारी आलो . एचआरसीटी मध्ये थोडं इन्फेक्शन फुफ्फुसात झाल्याचे निदर्शनात आले . रात्री लगेच ग्रामीण रुग्णालयात अॅडमीट झालो . ऑक्सीजन लावणे क्रमप्राप्त होते . आजवर कोरोनाचा त्रास ऐकत आलो होतो . आज स्वतः अनुभवत होते . 'जावे त्याच्या वंशा कळे .. ' हेच खरे.

        रात्री बारा वाजता खंडाळा रूग्णालयात गेलो . बेड तयार करून साडेबाराला ऑक्सीजन पुरवठा सुरू केला . काही तातडीची इंजेक्शन दिली . रात्री दोन वाजता शलाका व अक्षयला घरी जायला सांगीतले. 


गुरूवार दि . ८ - सकाळपासून थोडं आवरलं , फ्रेश झालो पण दम वाढला होता .थोडंटेन्शन सुध्दा ..  ऑक्सिजन सातत्याने सुरूच होता . सकाळी नाष्टा केला पण तोंडाची चव गेली होती . वास तर दोन दिवस कळतच नव्हता .  वैद्यकिय अधिक्षक डॉ कोरडे , डॉ . लोखंडे स्वतः येऊन तपासले . सर्वांना उपचाराच्या सूचना दिल्या . पटापट औषधे दिली . पुन्हा अॅन्टीजन टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली .  दुपारपर्यंत खूपच दमछाक झाली , तोपर्यंत फोन बंदच ठेवला होता . दुपारनंतर अनेकांचे फोन झाले .काहींचे उचलले, काहीचे उचलता आले नाही . अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता . प्रशांतला फोन केला . 

पाच वाजता आमदार मकरंदआबांचा फोन आला त्यांनी बराच वेळ विचारपूस केली . त्यांनी खूपच धीर दिला . त्यांचे अनुभव सांगीतले . कुठलीही चिंता करू नका , काही अडचण वाटल्यास फक्त फोन करा . वाटेल ती मदत करू.   औषधाची चिंता करु नका म्हणाले. त्यांच्या सकारात्मक बोलण्याने चांगला धीर आला .  एकदम विचारात बदल झाला . त्यांनी डॉ . कोरडे यांनाही फोन करुन उपचाराबाबत काळजी घ्यायला सांगीतले होते . 

         परत साडेपाच वाजता कोरडे सर आले . दहा मिनिटे चालुन सॅच्युरेशन तपासले . काय करायचं ते सांगीतले . 

सहा वाजता सगळी जीवलग मित्र मंडळी प्रवीण , राजेंद्र भोसले , जीजाबा काळे , हिरा , उमेश पवार आणि आणखी दोघे थेट वॉर्ड बाहेर येऊन बघून गेले . सायंकाळी योगेश , सचिन , सत्यवान सगळी भेटली . बरं वाटलं . लोकांच्या मनात भीती कमी झाल्याची जाणीव झाली . 

रात्री जेवण मग थोडा वेळ कसाबसा बसून काढला  . मग १० .५५ ला इंजेक्शन काही सलाईनमध्ये , काही शिरेत व एक पोटात ... मग ऑक्सीजन लावून निवांत पडून राहिलो . अचानक थोडी उबळ आली  .जीव कासावीस झाला  पण मनाचा निर्धार करून सहन केलं . थोडया वेळाने बरं वाटू लागलं . रात्री १ वाजता अंग पुन्हा दुखायला लागलं होतं . विचार करत होतो की गोळी मागावी का ? की येईल कमी ! साधारण पंधरा मिनिटे यात गेली . तेवढ्यात सिस्टरांनी आवाज दिला . कोणीतरी आलं होतं . समोर शलाका होती . बिचारीला झोपच नाही . त्यांनी मग गोळ्या दिल्या . यावेळी नायगाववरून दोघे पाहुणे काही कामाने आले होते तेही भेटून गेले . गोळी खाऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न सुरू केला . 

शुक्रवार - ९ - सकाळी फ्रेश झालो . आठ वाजता नाष्टा केला .  तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . अविनाश पाटील, 

डॉ . येळे , डॉ . पडळकर यांनी विचारपूस केली.  

शलाकाने स्वतः जेवण आणले , औषधे , इंजेक्शन दिले . 

ऑक्सीजन लावून ओणवा झोपलो. सकाळी चंद्रकांत पाचे , प्रवीण पवार भेटून गेले .

      तीन वाजता डॉ . कोरडे यांनी तपासले .  ऑक्सीजन शिवाय सॅच्युरेशन लेव्हल पाहिली . खरं तर सॅच्युरेशन वाढणं अपेक्षित होत पण वाढल नाही . ब्लड रिपोर्ट आले होते त्याचे अवलोकन केले नंतर त्यांनी काही इंजेक्शन देण्यास सांगीतली . दिवसभर अनेक विचार डोक्यात घोळत होते .

सायंकाळी पाच वाजता डॉ . लोखंडे सर येऊन गेले . त्यांनी सॅच्युरेशन चेक केलं . ऑक्सीजन लावून पालथे जास्तीत झोपा म्हणून सांगितले . बहिणीचा फोन येऊन गेला . तिने टेन्शन घेतलं होतं . तीला खूप समजावलं . शेवटी बहिणीची माया असते हेच खरं . महेश नानांचा फोन आला त्यांनी हॉस्पीटल बदलायचं असेल तर सांगा तयारी करतो म्हणून बोलले . रात्री संजय खामकर भेटले . पुरुषोत्तम जाधव साहेब , बाळासाहेब साळुंखे , अनुप  सूर्यवंशी , नवनाथ ससाणे , संजय जाधव इतर माझे मित्र असे दिवसभरात अनेकांचे फोन आले . सर्वानी धीर दिला . सोशल मिडीयावर अनेकांनी काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या . काहींनी देवाकडे साकडे घातले असल्याचे कळविले . हे लोकांचे प्रेम होते . रात्री ११ वाजता इंजेक्शन दिली गेली . डबा घेऊन आलेली शलाका रात्री अकरा वाजता घरी गेली . त्यानंतर ती जेवणार होती . 

शनिवार दि . १० - सकाळी लवकरच आटोपलं , कारण इंजेक्शन लवकर द्यायची होती . पण थोडं एक्झरशन झालं तरी धाप लागून श्वसनाला त्रास होतच होता . ऑक्सीजन लेव्हल वाढतं नव्हती . शलाका चहा नाष्टा देऊन आली . त्यांनीच सर्व इंजेक्शन दिली . श्वसन क्रीया सुधारत नसेल तर  मोठया हॉस्पीटलला शिफ्ट होण्याचा विचार सुरु होता . 

दुपारी १ वाजता आमदार मकरंद आबांचा  फोन आला . त्यांनी काळजी घेण्याविषयी सूचना केल्या . लागेल ती मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात . तोच अनुभव माझ्या बाबतीतही . आबांचा फोन आला की नेहमीच मोठा आधार वाटतो . सव्वा एक वाजता डॉ . कोरडे सरांनी राऊंड  केला . उपचाराच्या सूचना केल्या . दुपारचे एक इंजेक्शन व गोळ्या घेतल्या . पुरूषोत्तम जाधव साहेब , सुभाष भोसले साहेबांनी फोनवरून काळजी घेण्यास सांगीतले .  

चार वाजता सॅच्युरेशन व तापाची तपासणी केली . साडेचार वाजता चहा घेतला . बाहेर वादळं सुटलं , आभाळ गडगडू लागलं होतं, वीजांचा कडकडाट सुरू झाला . पावसाला सुरूवात झाली . मनात आलं देव करो नि पावसाबरोबर कोरोना वाहून जावो . 

सायंकाळी घरून फोन आला . मुलींच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल आला होता . दोघींना चांगले गुण मिळाले होते . एक सुखद बातमी कानावर आल्याने मन प्रसन्न झालं . फोन वरून दोघींचे अभिनंदन केले . 

आठ वाजता डाॅ . कोकरे यांनी फोनवरून माहिती घेतली . सुधारणा होतेय का याची चौकशी केली . 

पावसामुळे लाईट गेल्याने खूप गरम व्हायला लागलं होतं . त्यातच ऑक्सीजन वाढवला तरी कमी व्हायचा . काहीच कळेना . म्हटलं लाईट यायला वेळ लागला तर कसं होणार ?पण सिस्टरांना कल्पना देताच त्यांनी ऑक्सिजन व लाईटचा काही संबंध नसल्याचे सांगीतले . अमोलना नवीन सिलिंडर जोडायला लावला . ऑक्सीजन पुरवठा सुरळीत चालू झाला . मग बरं वाटू लागलं . 

रात्री नऊ वाजता डबा आला़. जेवण केलं . रोजची इंजेक्शन , औषधे घेतली . आता पोटातील इंजेक्शन तर नको वाटतं होत . रोज सकाळ संध्याकाळ ते सुरू होतं . पण नाइलाज होता . बाकी किरकोळ तपासण्या झाल्या . ऑक्सिजन सुरू केला . आज लाईट आलीच नाही त्यामुळे उकडून  जाम झालो त्यामुळे झोप लागेना . अधूनमधून पेपरने वारा घालत होतो पण निरर्थक ! रात्री सव्वा एक वाजता थोडं अस्वस्थ वाटलं , काहीतरी प्रॉब्लेम झाला . बघितलं तर ऑक्सीजन पुरवठा कमी झाला होता . लगेच धायगुडेंना कल्पना दिली . त्यांनी सिलिंडर बदलून तो सुरळीत केला . दीड वाजता पुन्हा कलंडलो . 

रविवार दि . ११ सकाळी लवकरच जाग आली . ऑक्सीजन बंद करून फ्रेश व्हायला गेलो . थोडं दमल्यासारखं झालं . पण नंतर सेट झालो . मग हातपाय धुवून कपडे बदलले . घरून नाष्टा , चहा आला होता . तो घेतला . जरा छान वाटलं . मग पाच मिनिटे चालून बघितले . सॅच्युरेशनमध्ये वाढ झाली होती . याचे मोठे समाधान वाटले . मग शलाकाने नेहमीची औषधे इंजेक्शन दिले . त्यानंतर आणखी बरं वाटलं . तशी कल्पना डॉ . कोरडे यांना दिली . प्रशांतला फोन करून कळवलं . अकरा वाजता त्यांनी राऊंड घेतला . कंडिशन सुधारते आहे असे सांगितले त्यामुळे काळजी कमी झाले . 

साडेबाराच्या सुमारास मनोज पवार येऊन चौकशी करुन गेले . तसे अनेकांचे फोनही आले . दुपारी जेवण छान झालं . दुपारचं एक इंजेक्शन देण्यात आलं . त्यानंतर ऑक्सिजन लावून निवांत पहुडलो असताना ' फरगॉटन आर्मी - बॅटल ऑफ १९४२ - ४३ ' पाहत बसलो . देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेचे योगदान यातून समजले . 

सायंकाळी चहाच्या वेळी थोडं चालून बघितलं . काही फरक वाटतोय का चेक केलं . पण परिस्थिती सकाळ सारखीच होती . आठ वाजता डॉ. कोरडे सरांनी फोन करुन परिस्थिती विचारली . त्यांना आज राऊंडला येता आले नव्हते . त्यांचीच तब्बेत थोडी पावसात भिजल्याने बिघडली होती . महेश नानांचा सारखा पाठपुरावा होता . शिफ्ट करायचं असेल तर लगेच मला सांगा . मी बघतो पुढचं काय ते ? पण त्यांना म्हटलं जरा धीर धरा , उदया बघू काय करायचं ते ? गरज वाटली तर निर्णय घेऊ असं ठरवलं होतं . घरच्या सगळ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता ही खूप समाधानाची बाब होती . 

रात्री नऊला जेवण झालं . तेव्हा डॉ़ . कोकरे यांनी राऊंड दिला . दहा वाजता रात्रीचे इंजेक्शन आणि औषधे नेहमीप्रमाणे घेतली . उदयाचा उष:कालापूर्वीची रात्र कशी जातेय याचा विचार करत बसलो . रात्री बारा , तीन वाजता दोनदा लक्षपूर्वक उठून ऑक्सीजन पुरवठा काही वेळ बंद केरुन पुन्हा सुरु केला . दर दोन तासांनी मध्ये बंद करणे गरजेचे असते . 

सोमवार दि . १२ - सकाळी लवकर उठून फ्रेश झालो . आज जरा स्वतःला तपासून बघायचं होतं . रोज फ्रेश होण्याच्या काळातही थोडा दम लागायचा . पण आज तो कमी जाणवला . त्यानंतर थोडे प्राणायाम करून पाहिले . पण म्हणाव्या तेवढया क्षमतेने ते करता आले नाहीत . आठ वाजता नाष्टा झाला त्यानंतर जरा चालून पाहिलं . सगळं ठीक होतं . सॅच्युरेशन थोडी वाढ होती . त्यामुळ बरं वाटलं . 

दहा वाजता डॉ . कोरडे यांचा राऊंड झाला , त्यांनी तपासणी केली . ऑक्सीजन चालू ठेवायला लावले . नेहमीची इंजेक्शन रेग्यूलर करायला लावली . साडेअकरा वाजता इंजेक्शन दिली गेली . त्यानंतर एक वाजता अक्षयने जेवण आणून दिले . त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ येऊन भेटून गेले . अनेकांचे फोन चालूच होते . 

आज दिवसभर पडून पुस्तक वाचत बसलो . रोजच पानं चाळतं होतो . पाच वाजता चहा घेऊन थोडं दहा मिनिटे चालण्याचा सराव केला . अजून थोडी धाप लागत होती . पण आता मागे हटायचं नव्हतं . 

रात्री आठ़ वाजता सिस्टरांनी नेहमीची तपासणी करून रिडींग घेतली . नऊ वाजता डॉ . कोरडे सरांनी राऊंड घेतला . परिस्थिती सुधारणा होईल असं सांगीतलं . आज थोडं अंग दुखत असल्याचं निदर्शनास आणून दिलं . तशा सूचना त्यांनी दिल्या . साडेनऊला डबा आला . पोटभर जेवण केलं . त्यानंतर शलाकाने रात्रीची सर्व इंजेक्शन दिली . तेवढयासाठी स्वतंत्र पीपीई कीट घालून रोज त्यांची सेवा सुरुच होती . त्यानंतर ऑक्सीजन लावून पुस्तक वाचत राहिलो . 

मंगळवार दि . १३- सकाळी साडेसहालाच उठलो . तसं रात्रीचं तीन चार वेळा उठणं व्हायचं . पण सकाळी लवकर आटोपलं . इतर पेशंटच्या लोडमध्ये फ्रेश व्हायचं म्हणजे थोडं रिस्की वाटायचं . त्यामुळं लवकर उरकलं . थोडं प्राणायाम केलं . अजूनही एक्झरशन झालं की थोडी धाप लागतच होती . त्यामुळे काळजी घेणं गरजेचं होतं . सकाळी शलाका व संगूचा फोन येऊन गेला . त्या नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळं आधार येतो . चहा आला होता . त्यासोबत आज बिस्किट घेतलं . नंतर नाष्टाही केला . 

सकाळी दहा वाजता डॉ . कोरडे यांनी राउंड घेऊन सूचना केल्या . सकाळी ११ वाजता सर्व इंजेक्शन दिली गेली .. त्यानंतर पुस्तक पारायण सुरूच होते . आज नव्याने पुन्हा रक्त तपासणी करायची होती त्यामुळे ब्लड कलेक्शन दिले . दिवसभरात नेहमीप्रमाणे फोन , मेसेज सुरूच राहिले . पाच वाजता चहा नंतर पुन्हा चालून पाहिले . सगळं ठिक होत चाललयं पण सॅच्युरेशन वाढ अपेक्षित तेवढी अजून नाही . रात्री दहा वाजता डॉ . कोरडे यांनी पुन्हा तपासणी करून औषधे दिली . रात्रीचं जेवण , इंजेक्शन आणि झोप नियमित क्रमाने सुरुच राहिले . 

बुधवार दि . १४ - सकाळी उठून आटोपलं . आज चांगली सुधारणा होती . सकाळी नाष्टा , औषधे घेऊन एक राज्यस्तरीय गुगल शैक्षणिक ट्रेनिंग अटेंन्ड केले . खरं तर ऑक्सीजन व सलाईन यामुळे एका हातात मोबाईल घेऊन केवळ हजेरी लावून  ऐकण्याचे काम केले . कृती काहीच करता आली नाही . मग निवांत वाचत बसलो . दिवसभर फोन येतच होते . पण बोलताना धाप कमी झाल्याचे जाणवले . तसं सॅच्युरेशन आणखी वाढायला हवं पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते हळूहळू वाढेल . त्यामुळे चिंता नाही . रात्री इंजेक्शन औषधे घेऊन झोपी गेलो . 

गुरुवार दि .१५ - सकाळी सहालाच आटोपलं . आज आणखी चांगलं वाटतं होतं . थोडी प्राणायाम केली . त्यामुळे तजेलदार वाटलं . सकाळपासूनच मन घराकडे ओढ घेत होतं . आज अंथरुणावर खिळून राहिलेले बारा दिवस झाले होते . हे बारा दिवस म्हणजे एक तपासारखे जाणवले . प्रत्येक दिवसाचा वेगळा अनुभव काही निराळाच . पण डॉक्टरांना विचारून आज घराची वाट धरायची हा निर्धार पक्का आहे . सकाळपासून व्हीटॅमीनचे दोन इंजेक्शन दिली .. त्यानंतर कालचे उर्वरीत ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले . 

 डॉ . कोरडे व डॉ . कोकरे सर यांनी पुढील सूचना केल्या . दुपारनंतर सोडण्याबाबत विचार करू असं त्यांना सांगितलं . सायंकाळी पाच वाजता शेवटी दवाखान्यातून सोडण्यात आले . 

घरी पत्नी , मुली , मित्र व शेजारी स्वागताची तयारी करून होते . सर्वानी छान औक्षण करून स्वागत केलं . घरी सुखरूप पोहचल्याचं मोठं समाधान होतं . आज कित्येक दिवसांनी मोकळा श्वास घेतला होता . घरी पोहचल्यानं बारा दिवस झालेल्या त्रासाचे विस्मरण झाले . आता पुढील महिनाभर  आरामच करावा लागणार आहे . 

    खरचं कोरोना काय आहे . याचा अनुभव याची देही घेतला होता . अतिशयोक्ती नव्हे पण मृत्यूच्या दाढेतून माघारी आलो हे तितकचं खरं आहे . देव करो आणि अशी वेळ कोणावरही न येवो . यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे .


 

॥ आधुनिक सावित्री ... यमाच्या तावडीतून सत्यवानाचा जीव वाचवून सावित्रीने आपल्या कुंकवाचं रक्षण केलं होतं हे पुराणकथात ऐकलं होतं . पण कोरोनाच्या भयाण काळाशी मी लढा देत होतो . त्या पाठीमागे घरची जबाबदारी सांभाळून हॉस्पीटलमध्ये सर्व औषधोपचारासह मानसिक आधार देऊन ज्यांनी अहोरात्र सुश्रूषा केली . त्या माझ्या अर्धांधांगिणी शलाका म्हणजे आधुनिक सावित्रीचं ! त्यांच्यामुळेच या सर्वाचा सामना करण्याचे धैर्य आले . आणि यातून सुखरूप बाहेर पडलो हे प्रांजळपणे कबूल करायलाच हवे . ॥ 


आयुष्य खूप अनमोल आहे . 

काळजी घ्या ... सुरक्षित रहा .. !! 


सेवेसाठी सदैव तत्पर ..

- दशरथ ननावरे [ श्रीमंत ]

        इतिहास- अभ्यासक 

        9922815133