Pages

Tuesday, 26 January 2021

॥ रानवाटा ॥ जोर - कोळेश्वर -असानेश्वर


 ॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- निखिल काशिद / कृष्णा तिकोणे 

जोर - कोळेश्वर - कुंभळजाई - असानेश्वर - जननीमाता - उळुंब

 एक अध्यात्मिक ट्रेक...

🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️


सकाळची वेळ होती मी, निखिल यादव आणि कृष्णा निघालो पहाटे पाच वाजता श्रीपाद जाधव साहेबांकडे वाईला. एक अध्यात्मिक ट्रेक करायचं एवढंच माहित होत. रेस्ट हाऊसला त्यांच्या घरी पोहचताच त्यांनी वजनकाटा समोर आणून ठेवला. समोर असलेल्या पोत्यांतून वेगवेगळ्या जातीचे तांदूळ पाच पाच किलो वेगवेगळ्या पिशव्यांत काढायला लावले. हे साहित्य कोळेश्वर पठारावरील जंगम वस्तीवरील किसन अप्पांच्या घरी द्यायला घेतले होते. कृष्णाने पटकन पिशव्यांवर नावे टाकली. काळी कुसळ , काळी साळ आणि तांबसाळ अश्या 3 जातीचे ते तांदूळ होते. बोडके अण्णांनी पटापट वजन करून पिशव्या बांधून घेतल्या. बोलता बोलता लक्षात आलं आजच्या ट्रेक मध्ये एवढेच पाचजण आहेत. साहेबांनी पटकन बाहेर येऊन विचारलं चहा कोण कोण घेणार. आम्ही घेणार म्हणून होकार दिला. निखिल यादव चहा पित नाही त्यांने नको म्हणून सांगितले. तोच साहेब त्याला म्हणाले चालेल तुझ्या साठी मस्त काढा आणतो. पण त्याला ठाऊक होत घरी आलं की साहेब नेहमी आयुर्वेदिक कडवट वनस्पती खायला लावतात. क्षणात तो बोलला साहेब मला चहाच द्या. त्याच बोलणं लक्षात आलं , त्यामुळे साहेब त्याला बोलले असुदे तुला दोन्ही थोडं थोडं देतो. सोबत बोडके अण्णांनी सुद्धा काढा घेतला. साहेबांच्या हातचा एकदम कडक आयुर्वेदिक चहा पिऊन घेतला. आता तिघे आम्ही तरुण वर्ग प्रत्येकाच्या बॅगेत 5-5 किलो तांदूळ दिला.वरून अजून 1-2 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकाच्या बागेत किमान 1 किलो गूळ. आमच्या तिघांच्या बॅग आता जवळपास 9-10 किलो वाजनापर्यंत पोहचल्या. 

सोनावणे मामांनी आम्हाला जोर पर्यंत गाडीने सोडलं. 

   


        जाता जाता बलकवडी धरणाशेजारी आम्हाला लागोपाठ 12 मोर दिसले. दिवसाची सुरुवात मस्त झाली. उगवतीचा सूर्य त्याबरोबर बलकवडी धरणाचे निळेशार अथांग पाणी आणि त्यापाठी दिसणारा एलिफन्ट पॉईंट च्या साक्षीने आम्ही एक फोटो घेतला. जोर मध्ये येऊन नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अध्यक्षांच्या घरी चहा झाला. आमच्या बरोबर वाटाड्या म्हणून जोरचे पांडुरंग मामा आले. वेळ वाया न घालवता लगेच आम्ही पठाराकडे धाव घेतली. फोटो विडिओ काढत आम्ही अर्धा च्यावर चढ चढलो. वाटेत साहेबांनी हँड स्लीव्ह घालायला त्यांची बॅग कृष्णा ला दिली. त्यांच्या डोक्यात काय आलं त्यांनी कृष्णा ला विचारलं , आपण toss करू छापा आला तर ही पण बॅग उरलेला चढ संपेपर्यंत तूच घ्यायची आणि काटा पडला तर मीच घेणार. त्यांनी टॉस करायला नाणं मागितलं. मी विचार केला माझं काय जातंय बॅग तर कृष्णा घ्यावी लागेलं. मी पटकन नाणं काढलं अन दिल. छापा पडला बॅग कृष्णा ने घ्यायची होती. पण मी नाणं दिल म्हणून कृष्णाच्या अन माझ्यात परत टॉस उडवायच ठरलं , मनातल्या मनात मी विचार करायला लागलो उगाच दिलं नाणं. टॉस उडवला आणि मी वाचलो. मग पुन्हा दुसरा निखिल अन कृष्णा मध्ये टॉस उडवला गेला आणि निखिलला बॅग घ्यावी लागली. स्वतःची जवळपास 10 किलोची बॅग घेऊन वरून हि सुद्धा बॅग घायची होती. निखिल ने थोडा वेळ घेतली त्यानंतर कृष्णा आणि पुन्हा माझ्याकडे अशी तिघांत बॅग फिरली शेवटी माझ्याकडे आली. नाणं देऊन भयंकर मोठी चूक केली एवढंच माझ्या मनांत चालू होत. माझी 9 किलोची बॅग आणि त्यात हि साहेबांची 4 किलोची बॅग एवढं ओझं झालं होतं ना. त्यात मधून मधून जँगल सम्पयच मोठा चढ वरती उन पण लागायला सुरवात. एक एक पाऊल टाकणं कठीण जात होत. या दोघांपॆक्षा जास्त अंतर बॅग माझ्याकडे आली. कधी साहेब स्वतःहून बॅग घेतात असं वाटत होत. पण दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून चुकूनही कोणाला प्रतिसाद द्यायचा नाही हे आता कायमस्वरूपी लक्षात राहील. 

   


  

या आधी एका झाडावर STF हि अक्षरे खडूने कोणीतरी लिहिली होती. त्यांचा अर्थ साहेबांना माहित होता पण बाकीच्या कोणाला तो समजेना आज ट्रेक च्या शेवटपर्यंत आठवून सांगा असं त्यांनी सांगितलं. ते शेवंतपर्यंत कोणी सांगितलं नाही. पण थोड्या वेळात मला पण ती अक्षरे उमगली होती. त्याच एवढा मोठा काही अर्थ न्हवता तर रस्ता चुकू नये म्हणून कोण्या ट्रेकर ने StraightForward हेच थोडक्यात लिहिलं होतं. आज आपण आध्यत्मिक ट्रेक साठी आलो होतो त्यामुळे सुरवातीलाच ,चालणे सुरु होतानाच आम्हाला जाधव साहेबांनी तीन प्रश्न देऊन ठेवले होते ते खालील प्रमाणे...

१) तुम्ही कोण आहात?

२) तुम्ही का जगताय?

३) तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट्य काय?

याची उत्तर दुपारी जेवण झाल्यावर द्यायची होती त्यामुळं डोक्यात कायम यांची निरनिराळी उत्तर डॊक्यात घुमत होती. मस्त पक्षांचा किलबिलाट ऐकत जंगलवाटेने आम्ही कोळेश्वराला पोहचलो. आत्तापर्यंत चार की मी अंतर झाले होते .हे इथल स्वयंभू जागृत देवस्थान आहे. इथलं शिवलिंग नऊ फूट लांब आणि 6 फूट रुंद एवढं मोठं आहे बाजूला दगडी चौथरा आहे डोक्यावरती छत नाही पण जंगलातील झाडांनी नैसर्गिक छत तयार झाले आहे. या ठिकाणी खूप पालापाचोळा जमा झाला होता. सर्वांनी ठरवून तिथली स्वच्छता केली. त्या ठिकाणी दोन मिनिटं शांत बसलो , मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. मग जाधव साहेब म्हणाले आपण आता ध्यान करू या , त्यांनी सांगितले मी व्यंकटेश स्तोत्र म्हणतो ते संपेपर्यंत सर्वांनी ध्यान करा ( डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रीत करायला सांगितले ) . साहेबांनी व्यंकटस्रोत म्हणायला सुरवात केली. डोळे बंद करून सर्वांचे लक्ष त्यांच्या आवाजाकडे होते. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. डोक्यात बरेच विचार येत होते. हळू हळू ते बाजूला होऊन मन एकाग्र होऊ लागले. पक्षांचा किलबिलाट पण बंद झाला जणू ते सुद्धा द्यान लावून ऐकत होते. थोड्या वेळानंतर सगळ्यांना डोळे उघडायला लावले. खरं तर डोळे उघडायची इच्छाच होत न्हवती. पण तेव्हा समजलं आपण एक दोन पाच मिनिटं न्हवे तर चक्क अर्धा तास ध्यान लावून बसलो होतो. मला तर स्वतःवर एवढा विश्वास बसत न्हवता एवढा वेळ आपण असे बसूच शकत नाही वाटत होत. जाधव साहेबानी प्रत्येकला ध्यानाचा अनुभव विचारला परंतु कोणीच काहिच बोलले नाही.......सर्वजण एका वेगळ्याच तनदरी मध्ये होते कोणालाच ध्याना मधून मिळालेली वेगळीच अशी शांतता तोडण्याची इच्छा होत न्हवती . काही वेळाने प्रत्येकाचे अनुभव घेण्यात आले सगळेजण शांत झाले होते. 



बोडके अण्णांनी कोलेश्वराला गुळाचा नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी  प्रसाद म्हणून गूळ खायला दिला , नाश्ता केलेला नसल्या मुळे सर्वांनी गुळाच्या छोट्या ढेपा खाऊन पाणी पिले.तिथून जंगम वस्तीवर विठ्ठल अप्पांच्या घरि जायचं होत. कृष्णा ला तर सकाळपासूनच खूप भूक लागली होती. वस्तीवर ताक प्यायला मिळेल का हा त्याचा प्रश्न वारंवार आमच्या कानावर पडत होता. जंगमवस्तीवर जाताना वाटेत एक कुंभळजाई देवीचे मंदिर लागते दर्शन घेऊन पुढे निघताच जाधव साहेबांच्या पायाखालून एक फुरसे जातीचा साप जोरात वळवळत बाहेर आला. त्यांच्या पावलावर पाय ठेवत मी मागे चाललो होतो. माझा पाय त्यावर पडणार तोच मला जाणवलं. आणि मी जोरात ओरडून पाय हवेतच फिरून बाजूला टाकला. कृष्णा अन बोडके अण्णांनी त्याच निरीक्षण करून घेतलं. अश्या प्राण्यांपासून आपली काळजी घेण्यासाठी डोंगरावर आपल्या पायांत चांगले बूट आणि फुल पॅन्ट असावी. पुढं समोरून 3 आजीबाई चालत येत होत्या त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय विचार आले असंतील काय माहित. पण जाधव साहेबांनी त्यांची विचारपूस केली. ते लोक गवत आणण्यासाठी चालले होते. आम्ही आणलेल्या तांदळातून एक पाच किलोची पिशवी आणि एक किलो सेंद्रिय गूळ त्यांना दिला. पण त्यांना ओझं होईल म्हणून जंगम वस्तीवर ठेवतो सांगून त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो घेतला. सगळे जण त्यांच्या पाया पडले आणि जंगम वस्तीकडे पाऊले टाकायला सुरवात केली. त्या तीन आजीबाई बऱ्याच भावुक झालेल्या दिसल्या. त्यानंतर आम्ही भुके च्या पोटी सपासप पावले टाकत एकूण सात ते आठ की मी चालून कोळेश्वर ते किसन जंगमआप्पांचे घर हा टप्पा पार केला .



           मुख्य पठारावर्ती दाट जंगलाच्या मधोमध जंगम वस्तीजवळ किसन अप्पांच घर आणि भलेमोठे गव्हाचे शेत होते.अद्याप किसन आप्पांच्या घरी लाईट पोहोचली नाही . खरं तर येथील गहू अत्यंत चविष्ट आणि उत्तम प्रतीचा असतो हा फक्त दवबिंदुवर पिकवला जातो (म्हणजे बिन पाण्याचा , पठार उंचावर असल्यामुळे सकाळी पडणाऱ्या दवा वर ते उगवतात ). अप्पांच्या घरी पोहचताच त्यांचा कुत्रा बंटी आमच्यावर जोरदार आवाज चढून भुंकत होता. त्यांच्या घरासमोर मोठं शेणाने सरावलेले अंगण आहे. गेल्या गेल्या हात पाय तोंड धून घेतले आणि झऱ्याचे मस्त थंडगार पाणी पिऊन मन तृप्त करून घेतले. तेवढ्यात माझी नजर कृष्णकडे गेली हा तिथंच अंगणात आडवा झाला होता. त्याची भुकेची तीव्रता पाहून त्याला ताकाचे आश्वासन देण्यात आले. जंगम कुटुंबियांसाठी आणलेला सेंद्रिय गूळ, काकवी आणि वेगवेगळे तांदूळ त्यांना देऊन टाकले आणि उत्तम जेवणावर ताव मारला. जेवण उत्तम झाले होते स्वयंपाकघरातून एकामागोमाग एक अश्या गरम गरम नाचणीच्या भाकरी आणि अप्रतिम गव्हाच्या चपात्या येत होत्या. सगळेजण फुल्ल जेवले. आणि अंगणात येऊन झोपून गेले. 


जाधव साहेब मात्र झोपले न्हवते ते आत बसून जोर ते महादेवाचा मुरा या पुढील ट्रेक चे नियोजन करत होते .मला तर खूप गाढ झोप लागली होती. वेळ खूप झाली होती खाली तुपेवाडीत उतरायचं होत साडेचार वाजले.  पण ज्या कारणासाठी ट्रेकचं नियोजन केलं होतं त्या विषयावर चर्चा बाकी होती. आप्पांच्या घराशेजारीच असनेश्वराचे मंदिर होत तिथं जाऊन चर्चा करायची असं ठरल मग आम्ही चौघेही डोळे चोळत आवरु लागलो, पटकन बुट घातले नि तोंडावर पाणी मारून मंदिराच्या दिशेने निघालो...किसन अप्पा जंगम जाधव साहेबाना म्हणाले ,सर आपण खपली गहू बघून मंदिरात जाऊ या . हे खपली गव्हाचे बी जाधव साहेबानी किसन अप्पां ना दिले होते , आणि साहेबाना सुद्धा खपली गहू कसा आला आहे हे पहायची उत्सुकता होती . मग आम्ही त्यांच्या शेता ला पूर्ण वेडा मारून मंदिरात गेलो . जंगम अप्पानी शेतामध्ये गहू हेच मुख्य पीक पेरले होते त्या मध्ये साहेबांनी दिलेला खपली गहू थोड्या प्रमाणात आणि त्यांचा नेहमी चा गहू  सगळीकडे होता .या त्यांच्या नेहमी च्या गव्हाचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे त्याला इतर गव्हा प्रमाणे तूस न्हवते . ते त्यांचे परंपरागत चालत आलेले देशी गव्हाचे बी होते . गव्हा व्यतिरिक्त त्यांनी थोडी ज्वारी , हरबरा ,पावटा ,असे थोडे थोडे खान्या पुरते त्यांनी पेरले होते......कारण कोणतीही गष्ट आणायची म्हंटले तर त्यांना दीड तास खाली जायची आणि दीड तास परत यायची पायपीट फक्त खालच्या गावात जायला करायाला लागते , आणि वाई सारख्या ठिकाणी यायची पायपीट वेगळीच . त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी होणाऱ्या त्रासाची जाणीव आम्हाला प्रकर्षांने झाली .आणि रोज किसनाप्पांचा मुलगा अनिकेत दूध घेऊन डेरी मधे घालण्यासाठी एकूण तीन तासाची उतर-चढ करून वाशिवली मध्ये येतो हे ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला .



                मग आम्ही पूर्ण शेताचा फेर फटका मारला ,आणि मंदिरा जवळ आलो . फेरफटका मारत असताना किसनाप्पां म्हणाले की या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही त्या मुळे गहू जोमात आला नाही , त्यात माकडे ,खारुताई , रानडुकरे नुकसान करतात ती वेगळीच .त्यांनी नुकसान करू नये म्हणून दिवसरात्र डोळ्यात तेल घालून त्यांना राखण करायला लागते .किसन अप्पानी आणि आम्ही असनेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला नि पुन्हा शांततेचा अनुभव आला अगदी सकाळी कोळेश्वराच्या मंदिरात आला तसा, विचारचक्र पुर्ण थांबलं होत मनात विचार येतच नव्हते तिथं असनेश्वराचं दर्शन घेऊन विषयावर चर्चा सुरू केली. 


*हि चर्चा आपण कृष्णा च्या शब्दांतून पाहू ....*

कृष्णा : - [पुन्हा एकदा प्रश्न सांगितले गेले आता चर्चेत तिघांचा समावेश झाला होता (किसन अप्पा आणि त्यांची मूल)

काकांनी (जाधव साहेबानी )विचारले "सांग निखिल तु कोण आहेस, तु का जगतोय आणि तुझ जगण्याचे उद्दिष्ट काये?" निखिल म्हणाला "मी या पृथ्वीतलावर एक जिव आहे, मी जगतोय कारण माझ्याकडून लोकांची कामे व्हावीत, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे व माझे उद्दिष्ट आहे की माझ्यामुळे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे उलट लोक माझ्यासोबत आनंदी असावीत आणि त्यांचा फायदा व्हावा. " काकांना निखिलचे उत्तर फार आवडले व ते म्हणाले सांग निखिल (यादव) तु बोल आता तर निखिल (यादव) म्हणाला "साहेब मी सगळ्यात शेवटी बोलतो अजून विचार केला नाही मी" यानंतर नंबर आला माझा मी म्हणालो कि, " मी शून्य आहे, मी का जगतोय याचे उत्तर नाही माहिती आणि उद्दिष्ट अजून ठरले नाही" पुढे बाकी सगळ्यांनी निखिलची (काशिद) वाक्ये आहे तशी forward केली नि सगळे शांत झाले... एकूणच महाभारतातील अर्जुनाप्रमाने आमची अवस्था होती, काकांनी सगळ्यांवरूण नजर फिरवत श्रीकृष्णाप्रमाने अध्यात्मिक चर्चेचा प्रारंभ केला, यापूर्वीही वरचेवर काकांनी अध्यात्मिक विषय मांडले होते आणि तसा सरावही करून घेतला होता.  काका सांगू लागले, "पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, मी आत्मा आहे, ना शरीर, ना हा चेहरा, ना मन, ना बुद्धी मी ईश्वर किंवा परमात्म्याचा एक अत्यंत सुक्ष्म भाग आहे, मी एक आत्मा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मी जगतोय कारण एक ना एक दिवस मला परमात्म्याचे दर्शन होईल किंवा व्हावे यासाठी भले मग ते या जन्मात होईल पुढच्या होईल येत्या हजारो, लाखो जन्मात होईल पण ते होणारच आणि यासाठीच ईश्वरप्राप्तीसाठीच आपण जगत असतो. प्रश्न तीनचे उत्तर माझं उद्दिष्ट आहे कि आत्मसाक्षात्कार घडावा, ईश्वरप्राप्ती व्हावी थोडक्यात मोक्ष हे अंतिम आणि एकमेव उद्दिष्ट आहे."

      ईश्वर प्राप्ती , मोक्ष ही गोष्ट मिळवण्या साठी स्वामी विवेकानंदांनी सांगीतलेल्या कर्मयोग , भक्तियोग ,राजयोग आणि ज्ञानयोग या चार मार्गांविषयी काकांनी थोडक्यात आम्हाला प्रत्येक मार्गाबद्दल माहीती दिली .

तीन्ही प्रश्नांची उत्तरे देवून झाली होती आता कळू लागले कि रोजची धावपळ, क्लेश, थकवा, अपेक्षा, पैसा, सुख-दु:ख, जन्म आणि मृत्यू ह्या सगळ्या क्षणीक गोष्टी आहेत, तरी जीवन जगत असताना ते कसे जगावे याबद्दल काका सांगणार होते. तीन प्रश्नांची उत्तरे दिली पण उद्दिष्टाकडे जाण्याचा मार्गही माहिती असावा आणि तो मार्ग आहे अष्टांगयोग. मला याआधी काकांनी अष्टांगयोगाबद्दल सांगितले होते त्यामुळे आता बाकी लोकांना ते मी सांगावे असे त्यांचे म्हणणे होते, आणि मी सांगु लागलो, अष्ट म्हणजे आठ, याचा अर्थ असा नाही कि आठ मार्ग आहेत मार्ग हा एकच आहे आणि या मार्गामध्ये आठ पाय-या आहेत त्या म्हणजे *यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी* हे अष्टांगयोग आहेत. यांपैकी पहिलं म्हणजे यम यामध्ये अहिंसा , सत्य , अस्तेय , ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहचा समावेश होतो .

 अहिंसा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही जिवाला तन मन आणि वचनाने त्रास झाला नाही पाहिजे,      सत्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माणसानं सत्यच बोलल पाहिजे .

चोरीने, लाबाडीने किंवा बलपूर्वक कोणाचीही वस्तु न घेणे म्हणजे अस्तेय .

सर्व अवस्थेत तन, मन, वचनाने मैथूनचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य , त्याच्या विचाराचा, बोलण्याचा त्याग म्हणजे ब्रम्हचर्य .

गरज असो किंवा कोणतीही परिस्थिती असो कोणाकडूनही कुठलीही वस्तू न स्वीकारने म्हणजे अपरिग्रह

 हे यम आहेत यानंतर नियम यामध्ये तप, स्वाध्याय, शौच, संतोष आणि ईश्वर प्राणिधान यांचा समावेश होतो,    तप म्हणजे व्रत, उपवास इत्यादीने शरीर संयम करणे .

मंत्रउच्चारण-वेदपठण इ. स्वाध्याय मध्ये येते मंत्रउच्चारणाचे तीन प्रकार असतात वाचिक, उपाशु, मानस यामध्ये मानस जप हा उत्तम मानला जातो, वाचिक म्हणजे इतरांना ऐकु जाईल असा स्वर, उपाशु म्हणजे पुटपुटने व मानस म्हणजे सतत मनातल्या मनात जप करणे. 

बाह्य आणि अभ्यंतर शौच असे शौचचे दोन प्रकार आहेत, बाह्य म्हणजे शरीर शुद्धता आणि अभ्यंतर म्हणजे मनाची शुद्धता, 

ईश्वकृपेने जे काही प्राप्त झाले आहे यातच समाधान शोधणे म्हणजे संतोष .

आणि सतत ईश्वर नामस्मरण करणे ईश्वर चिंतन करणे म्हणजे ईश्वर प्राणिधान. 

हे झाले यम आणि नियम या दोनच योगामध्ये थोडी जरी प्रगती झाली तरी आयुष्य बदलेल कर्म सुधारणा होईल असे काकांचे सांगणे असते, पुढे 

आसन म्हणजे पाठीचा कणा ताठ, मान सरळ व कोणत्याही आसन प्रकारात बसून राहणं,

 प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण करणे, प्राणायामचा नियमित सराव करणे, 

प्रत्याहार म्हणजे आपले इंद्रिये तसेच मन बहिर्मुख आहेत (जी सतत बाहेर कार्य करीत असतात ) त्यांना खेचून घेऊन नियमित करून ठेवणे म्हणजेच अंतर्मुख करणे . 

धारणा म्हणजे डोळे मिटून मन दोन भुवयांच्यामध्ये धारण करून ठेवणे यापुढे ध्यान येते ध्यान म्हणजे दोन भुवयांच्यामध्ये असलेल्या मनाला बाकी विचारातून मुक्त करून एकाग्र करणे.

 व सगळ्यात शेवटी येते समाधी, मन पूर्णपणे एकाग्र झालं कि चित्त स्थीर होते आणि जी निश्चल निरामय अवसंघ येते , त्याच अवस्थेत  कायमस्वरूपी रहाण्याच्या क्रियेला समाधी म्हणतात.

 अशाप्रकारे अष्टांगयोगबद्दल चर्चा झाली आणि थोडक्यात कर्मयोग, ध्यानयोग, राजयोग आणि ज्ञानयोगबद्दल सांगितले व इथे आमच्या अध्यात्मिक चर्चेची सांगता झाली.]


 Yogeshvoice नावाच्या youtube chanel वरती ह्याबाबत सविस्तर वर्णन, चर्चा, माहिती असून काकांनी सगळ्यांना link share करतो असे सांगितले व आम्ही पुन्हा दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.



दर्शन घेऊन आम्ही अप्पांच्या दारातील जंगली केळी पाहिली हि खूप उंच आणि थोडी आगळीवेगळी असतात. अजून चिवचिव असे नाव असलेले फळ पाहायला मिळाले.  हि वेलवर्गीय वनस्पती आहे. दिसायला पेरू सारखं आणि यावर अलगत कोवळे काटे असतात. याची भाजी पण करता येते आणि काकडी सारखे चिरून सुद्धा खाऊ शकतो. आणखी म्हणजे दत्तोपंत सपकाळ यांनी बनवलेली आगळी वेगळी शेलीची केरसुणी पाहायला मिळाली. पावणेसहा वाजले होते तुपेवाडीत उतरायला दीड तास लागणार होता. म्हणून थोडी जवळची वाट उलूम्ब गावात उतरते त्याने जायचं ठरलं. हि वाट तीव्र उताराची आहे. या वाटेने बलकवडी धरणाच्या भिंतीजवळच आपण पोहचतो. 



सूर्यास्त झाला फोटो काढले. तीव्र उतार असल्याने उतरताना पाय घसरत होते त्यात अंधार पडणार होता त्याआधी खाली जाण्यासाठी प्रयत्न चालू होते. लवकर घरी पोहचणार म्हणून आम्ही टॉर्च पण सोबत ठेवले न्हवते. अर्ध्या पर्यंत उतरताच अंधार झाला. आता मोबाईल चे टॉर्च काढून आमची पायपीट चालू होती. समोर पाचगणी महाबळेश्वर चे दिवे चमकत होते. काळीकुट्ट रात्र त्यात चांदण्यांचा मंद प्रकाश. अंधारात सुद्धा खाली लक्ष वेधून घेणारे मनमोहक बलकवडी धरणाचे पाणी चमकत होते. त्यामुळे उतरताना कोणताही थकवा जाणवत न्हवता. तेवढ्यात कृष्णाला मोरपीस सापडले त्यालाच कसे सापडले ते पण अंधारात यावर थोडा वेळ मजेशीर चर्चा रंगली. आणि आम्ही खाली बलकवडी धरणाच्या जवळ असणाऱ्या उलूम्ब गावातील दत्त मंदिराजवळ येऊन पोचलो. एकूण जवळ जवळ चौदा की मी चा ट्रेक आमचा पूर्ण झाला होता .मंदिरा जवळ गाडी आमची वाट पाहताच होती .

      अश्या रीतीने आमचा हा एक अविस्मरणीय अध्यात्मिक दिवस ठरला. इतर ट्रेक पेक्षा काहीतरी वेगळं समाधान मिळालं होतं. एक शांत , सुखद ,अविस्मरणीय अनुभव घेतल्याची जाणीव होत होती . सकाळपासून तब्बल १४ किलोमीटर अंतर कापल होत. 

      प्रत्येक ट्रेकला श्रीमंत दशरथ ननावरे सर हे सविस्तर लेख लिहीत असतात. माझ्याकडे विडिओ बनवणे हेच काम आले पण ते या ट्रेक ला आले नसल्याने मला हे लिहिणे होते तरी ननावरे सरांनी हा ब्लॉग त्यांच्या ब्लॉगस्पॉट मध्ये घेतला तर  आम्हाला प्रचंड आंनद आहे.


                         - निखिल काशिद आणि कृष्णा तिकोने

Wednesday, 20 January 2021

॥ रानवाटा ॥ - किल्ले रायरेश्वर ते शिवथरघळ

 


॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे [श्रीमंत ] , इतिहास अभ्यासक 

किल्ले रायरेश्वर ते शिवथरघळ


राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा .... ' असे महाराष्ट्राचे वर्णन अभिमानाने केले जाते . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या पर्वतरांगातून सामावलेली महाराष्ट्राची भूमी म्हणजे एक स्वर्गच ! स्वराज्य संकल्पनेची शपथ ज्या भूमीवर गर्जली तो किल्ले रायरेश्वर ते 

सह्यशिखरातील पौराणिक पवित्र ठिकाण असलेले क्षेत्र शिवथरघळ हा निर्भिड अरण्यातील एक साहसी , शारीरिक कस लावणारा , विलोभणीय निसर्गाचे दर्शन घडवणारा रेंज ट्रेक .  

       सह्याद्रीचा पर्वत असो वा त्याच्या उपरांगा मधील विविध डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटा असो , त्या वाटेने मार्गक्रमण करायचं .सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेले ऐतिहासिक गड किल्ले , डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे अथवा जंगलाच्या आडवाटा असो त्याच्याशी आपलेपणाचं नातं जोडायचं हा 'शिवसह्याद्री पायदळ ' ट्रेकर्सचा छंदच . आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही प्रतिसाद दिला नाही असं आजवर तरी घडलं नाही . नेहमीप्रमाणे त्यांनी ही मोहिम करण्याचे निश्चित केले . 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे साडेतीन वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे चार वाजता वाई विश्रामगृहात जमवाजमव झाली . घाईगडबडीतही अभिजीत सरांनी यामा बाईक राईडची हौस पूर्ण करून घेतली . तसं सरांना विविध प्रकारच्या बाईक आणि सायकल राईडची भारी हौस . मौजमजा आणि जीवनाचा आस्वाद अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही घेता येतो हे त्यांच्याकडे पाहून जाणवते . पटापट आवराआवर करून श्रीपाद जाधव साहेब , पुण्याहून आवर्जुन आलेले अभिजीत गोरे , मिलिंद दगडे , कपील दगडे , सचिन देशमुख , अतुल गाढवे, निखिल , अभिजीत आणि मी जीपमधून रायरेश्वराच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात तासाभराचा प्रवास करून खावली मार्गे खिंडीत पोहचलो . 



 गडाच्या पायथ्याला थंड वाऱ्यानं अंगावर शहारा आला . अंधार दाटलेलाच होता तरीही गाडीच्या प्रकाशझोतात फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही . थंड हवेचा गारवा अंगाला झोंबत होता . तशातच रायरेश्वराचा डोंगर चढायला सुरुवात केली . थोडया चालीनंतर मुरमाड मातीच्या पायऱ्या चढुन छोटी वळणे घेत लोखंडी सीडीच्या पायऱ्या चढू लागलो . मी पटपट वरती पोहचलो इतरांचा व्हीडीओ करायचा होता . अंधारातच तो केला . सर्वजण गडाच्या माथ्यावर पोहचलो . थंड हवेचा गारवा आणखी जाणवला . पण पहाटेचा गार वारा , कुठून तरी येणारा पक्षांचा आवाज , प्रसन्न आणि आल्हादायक वातावरण यामुळे सर्वाचेच मन तल्लीन झाले . 

         आजूबाजूचा हिरवागार परिसर न्याहाळत रमत गमत पुढे चालत होतो . वाऱ्याने हिरव्यागार गवताची पाती डुलत होती . चवर, सोनके , मिकीमाऊस, लालटाका यासह अनेक प्रकारची रानफुल आता सुकलेली होती .बघता बघता तलावाच्या बाजूने वळसा घालून पुढे गेलो . काही अंतरावर पाण्याचे टाके होते . गोमुखातून टाक्यात पाणी पडत होते . स्वच्छ , निर्मळ पाण्यात टाक्याचा तळ दिसत होता . आमची चाहूल लागताच खेकड्यांनी दगडाच्या कपारीकडे पळ काढला आणि आम्ही मंदिराकडे ! 

     रायरेश्वर देवालयाच्या प्रांगणात प्रवेश केला . शिवालयाचे  दगडी बांधकाम आजही मजबूत आहे . पूर्वीच्या छताची जागा पत्र्याने घेतली आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंग व पिंड आहे . शेजारी दगडी पणतीचा दिवा तेवत होता . अगरबत्तीचा वास सर्वत्र दरवळत होता . 'ओम नमः शिवाय ' चा जप आतून कानावर पडत होता . सर्वानी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले . शंकराची आरती सर्वांनी म्हटली याबाबतीत जाधव साहेब मोठे तरबेज !  मंदिरात शिवकालीन इतिहासाची जुजबी माहिती आणि शिवरायांच्या स्वराज्य शपथेचा फोटो लावलेला आहे . मंदिराच्या समोरच एका चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी राजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. शेजारीच छोटेखानी शाळेची इमारत आहे . 

         दर्शन घेऊन पश्चिमेच्या दिशेने पायवाटेने चालू लागलो . भाताच्या शेतीची जागा गव्हाच्या पिकाने घेतलेली . त्याला वळसा घालून पुढे गेल्यावर रायरेश्वरावरील वस्ती आहे . इथे काही मोजकीच घरे आहेत .पावसामुळे ती झावळयांनी व कुडांनी झाकलेली तशीच होती . कुत्र्यांच्या आवाजाने आम्ही आल्याची कानकून वस्तीवाल्यांना झाली . जाता जाता सोमनाथ जंगमांना आवाज देऊन पुढे चालतो झालो . तेथेच गोपाळरावांच्या घरी चहा घेतला . गरमागरम पोहे खात चर्चा झडल्या .  तेवढयात भोरवरून तीघे सहकारी पोहचले . मग मागच्या ओघळीच्या वाटेने रस्त्यावरची माती तुडवत आणि मागच्या ट्रेकच्या वेळी कोणत्या रस्त्याने गेलो याचा अंदाज लावत चाललो होतो . सोबत वस्तीवरचा एक कुत्रा होताच . केसाळ शरीर अन् झुबकेदार शेपटी यामुळे गडयाचा रुबाब वाढला होता . नेहमीप्रमाणे गडाच्या टोकापर्यत हा सोबत करणार याची खात्री होती . बरेच अंतर चालल्यानंतर एका मोठ्या शिळेवर उभे राहून फोटो काढले .  तासाभराच्या अंतरात रायरेश्वराचे भले मोठे पठार मागे टाकले होते . 

    


 वाटेत कार्वीच्या झाडांनी वेढा टाकला होता . त्यातून मार्ग काढायचा म्हणजे मोठे दिव्य . गतवेळी कार्वीच्या झाडांमुळेच अंगावर फोडया उमटल्या होत्या . त्याचा चांगलाच त्रास जाणवला होता . त्यामुळे भीती वाटत होतीच . रस्त्यात उगीच कार्वी उगवली असा विचार राहून राहून डोक्यात येत होता . कसाबसा रस्ता काढीत वाट मागे सारत होतो . अनेक वेडीवाकडी वळणे घेत , चढ उतार पायाखाली घेऊन पुढे सरकत राहिलो . आता यापुढे खरी कसोटी होती . भला मोठा डोंगर उतार तोही खडा उतार उतरून अस्वल खिंडीत पोहचायचे होते . ट्रेकच्या पहिल्या दिवसाचा हा टप्पा म्हणजे जीवघेणाच ! कापशीचा बदर म्हणून ओळखली जाणारी ही वाट म्हणजे अंगावर काटा आणणारी होती . एकमेकांच्या साथीने कुठं सरळ , कुठं वाकडं तर कुठं उलटं होऊन खाली उतरावं लागत होतं तेही अतिशय संथगतीने . या तीव्र उतारावरील निसरड्या वाटेवर पाय घसरला तर थेट दरीच्या तळाशी पोहचणार हे निश्चित होतं . त्यामुळे ज्या कार्वीचा तिटकारा वाटत होता ती कार्वीच आता आधाराला धावून आली होती . तीच्या साथीनं सांभाळूनच पाऊल पुढे पडत होतं . तास अर्धा तास नव्हे तर तब्बल चार तास हा बदर उतरायला लागले . शेवटचा एक टप्पा तर मोठा अवघड होता . छोट्या झुडपांच्या आधाराने तोही उतरला आणि पुढील जंगलातून वाट काढीत अस्वल खिंडीत पोहचण्यासाठी आतुरतेने चालत होतो . खालून पुढचे वाटाडे आवाज देत होतेच . सकाळी दहा वाजता खिंड गाठू असा बांधलेला अंदाज पुरता खोटा ठरला होता . दुपारचे एक वाजता खिंडीत पोहचलो . थोडा वेळ थांबून पाणी प्राशन केले . एका मोठया दगडी शिळावर बसून फोटो घेतले . जास्त वेळ घालवून चालणार नव्हते . पुढचा बराच लांबचा पल्ला गाठायचा होता . त्यामुळे रायरेश्वरावरील वाटाडेस्वामींचा निरोप घेऊन खिंडीतील जंगलातून चालते झालो . 



       या ट्रेकला भोरचे तीन शिक्षक सहभागी झाले होते . रस्त्याने गमतीजमती करीत त्यांचा ठरलेला डायलॉग कानी पडायचा ... ' जिलेबी देऊ पण खाल्लीच पाहीजे ' मला तर त्याचा मतितार्थ कळतच नव्हता . पण मनोरंजन भारीच झाले . वास्तविक हे तीघे पहिल्यांदाच आमच्या सोबत ट्रेकला आले होते . पण तग धरून चालत होते हे विशेष . अजूनही तास दीड तास प्रवास करून मानटवस्तीत दुपारच्या जेवणाचे नियोजन होते . जंगलाचा भाग उतरून नदीच्या कडेने चालत राहिलो . आता शिब्रा टोक डाव्या हाताला टाकून चालू लागलो . पुढे नदीच्या पात्रात थंड पाण्याने हातपाय धुवून फ्रेश झालो . लोक दमले होते पण पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता . आता एक मोठी टेकडी चढून जायचे होते . खडी चढण होती कशीबशी पाऊले पुढे टाकत होतो . वरच्या टप्प्यावर जाऊन मागच्या सहकाऱ्यांची वाट पहात बसलो . सर्वजण आल्यावर पुढे चालते झालो . 



आता मोहन गडाच्या पायथ्याशी मानटवस्ती दिसू लागली होती . टेकडीच्या उताराने पटापट उतरू लागलो . खरं तर सगळेच कंटाळले होते . जेवण करून पुढे निघायला चार वाजले तर मोहनगड करून उंबर्डेला मुक्कामी पोहचणे अशक्य असल्याने जाधव साहेबांनी माझ्याशी चर्चा केली . सर , पुढचं नियोजन काय करायचं . मानटवस्तीत मुक्काम करून पहाटे लवकर उठून शिवथरघळला पोहचू असाही विचार समोर आला . मी म्हटलं सर्वांचा विचार घेऊन ठरवू . साहेबांनी तिथेच गवतात मांडी घालून ठाण मांडलं . मोहनगडावर येणारा माणूस आलाय का?  यासाठी फोन करू लागले . पण फोन लागत नव्हता . तेवढयात सर्वजण आलेच . आता मुक्काम जर अलिकडे झालाच तर बरच झालं म्हणून मलाही खूप आनंद वाटत होता . पण साहेबांनी दमलेल्या लोकांच्या नावाच्या यादीत अभिजीत सरांचे पहिले नाव घेतले अन् सगळा डाव इस्कटला . हार मानतील ते अभिजीत सर कसले ? या माणसात नेहमी वेगळच रसायन पहायला मिळतं . प्रचंड झच्छाशक्ती ओतप्रोत भरलेली मला दिसली . आणि साहेबांनी त्यांचेच नाव घेतल्याने सरांनी आता काही झालं तरी ठरलेल्या ठिकाणीच मुक्कामी जायचं अशी स्पष्ट भूमिका घेतली . ठरल्याप्रमाणे ट्रेक करायचा असा जोर धरला . त्यामुळे मुक्काम अलिकडे होणार या आमच्या आनंदावर विरजन पडले . गपगुमान झपाझप पाऊले टाकत मानटवस्ती गाठली . जेवण तयारच होतं . चपाती, भाजी , वरण ,भात मस्त ताव मारला . यथेच्छ जेवण झालं . बाहेर अंगणात अंब्याच्या झाडाखाली सहज आडवं पडलो . बघता बघता सगळयांची वामकुक्षी लागली . चार कसे वाजले कळलच नाही . 



     मोहनगडाकडे आगेकूच करायचे होते . रात्री मुक्कामी जाण्यासाठी अर्धा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे सर्वांना पटापट आटपायला सांगीतलं . थंडीचे दिवस असल्याने झोरे कुटुंबियांसाठी आणलेले स्वेटर त्यांच्या सूपूर्त केले . सर्वानी मोहनगडाच्या चढणीला सुरुवात केली . हा गड पहायला सोपा वाटतो मात्र वाट वळणा वळणाने असल्याने चांगलाच घाम निघतो . मावळतीच्या दिशेने आम्ही वर चढलो . डोंगराला गवत कापणीची कामे सुरुच होती . भारा बांधण्यासाठी झाडाखाली एक जण कळकाच्या पातळ कांब्या काढत बसले होते . शेजारीच झाडाच्या खोबणीत लगोर अडकवलेली होती . मी उगीचच हातात घेऊन झाडावरच्या पक्षावर नेम धरला . शेजारी उभ्या असलेल्या गणेशाला फोटो काढायला लावला . वास्तविक त्यात पकडलेला दगड चार फूट पण लांब गेला नाही पण मोठ्या शिकाऱ्याचा आव आणला होता . पुढे मजल दरमजल करीत जंगलातील रस्ता तुडवत गडाकडे धाव घेत होतो . सर्वानाच घाई झाली होती . अंधार पडेपर्यंत गड जवळ केला होता . जननी मातेचे दर्शन घेऊन पुढे जाणे गरजेचे होते . पण आता अंधारातून मार्ग काढायचा होता . रस्ता दाखविण्यासाठी येणारा माणूस आलाच नव्हता . त्यामुळे मानटवस्तीतीलच वाटाडयांना सोबत घ्यायचे ठरले . किमान पाथरटाक्यापर्यंत पोहचता आले तर तिथेही मुक्काम करता येईल यावरही विचार झाला . पण उंबर्डे मुक्कामी त्याची खबर देणे गरजेचे होते . तसा प्रयत्न केला मात्र प्रकाश रावांचा फोन लागला नाही . 



        साहेबांनी सर्वांना सोबत चालण्याच्या सूचना केल्या . प्रत्येकाला बॅटरी काढायला लावली . काहींनी डोक्याला तर काहींनी हातात बॅटरी घेतली . काजवे चमकावे तशा विजेऱ्या रात्रीच्या अंधारात चमकू लागल्या . त्याच्या उजेडातच गड उतरायला सुरुवात केली . एव्हाना पाय चांगलेच भरून आले होते पण इलाज नव्हता . काही करून मुक्कामाला पोहचणे गरजेचे होते . एकमेकांशी कुजबुज करीत गड मागे टाकण्याचे काम सुरु होते . रस्त्याच्या बाजूच्या कळकाच्या बेटातून पानांची सळसळ ऐकू येत होती . मागे गडावर मुक्कामी गेलेल्या पथकातील काही जण आपल्या सहकार्‍यांना आवाज देत होते पण खालून वर चाललेले आम्हाला कोणीच भेटले नाही . तासाभराने खाली उतरुन जंगलाचा भाग संपला . आता नदी पार करून पुन्हा उंबर्डेच्या दिशेने डोंगर चढणे भाग होते . आता तर पायाचे तुकडे पडणेच उरले होते . मनात आले एखादी गाडी आली तर बरं होईल पण साहेबांपुढे हा विषय काढणे म्हणजे अवघडच . तसं मी अतुल जवळ बोललो पण त्याचही साहेबांना बोलण्याचं धारिष्ठय झाले नाही . खालच्या उतरणीला एक गाडी आली . कपील सरांसह कंटाळलेले काही जीव त्यात विसावले . बाकीच्यांनी पुढचा रस्ता धरला . रात्रीच्या अंधारात मजल दरमजल करीत रात्री साडेदहा वाजता उंबर्डे गावात पोहचलो . ओसरीला अक्षरशः अंग टाकून दिले . पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाण्याने स्वच्छ हातपाय धुतले . सुरजने पायाचे स्ट्रेचिंग केले त्यामुळं थोडं मोकळं मोकळं वाटलं . ताटं वाढायला घेतली आणि सर्वाची पंगत झडली . चविष्ट जेवणाचा आस्वाद सगळयांनी मनसोक्त घेतला . ओसरीला चटईवरच सर्वजण पहुडले.  डोंगरदऱ्यातून सुमारे तीस किलोमीटरची पायपीट करून दमलेले जीव धरणीमायच्या कुशीत कधी निद्रीस्त झाले कळलच नाही . 



       ट्रेकचा दुसरा दिवस तसा उशीराच सुरु झाला . कारण सगळेच उशीरा उठले . सर्वाचा चहा नाष्टा झाला . साडेनऊला निघण्याची तयारी झाली . एका घरासमोर मालक असल्यासारखे रुबाबदार फोटो काढले . पाळे दऱ्यातून खोल दरीत उतरायचे होते . वाट खूप अवघड आहे हे अगोदरच निखिलने सांगीतले होते . पण उत्सुकता लागली होती . सुरुवातच दाट झाडीतून झाली . वाट काढीत पुढे चाललोच होतो . एका वळणावरुन ओढयात उतरलो . हा मोठया धबधब्याचा भाग होता . इथं फोटोसेशन होणार नाही असं झालच नसतं . ती हौस पूर्ण केली आणि छोट्या चढणीने पुन्हा जंगलात प्रवेश केला पण एकदम दरीच्या कडेने . सावकाश पुढे चालते झालो . आणि पुढे अतिशय अवघड टप्पा समोर आला . एकतर एका बाजूला खोल दरी , त्यात वाट निसरडी होती . खाली नजर टाकली तर डोळे गरगर फिरत होते . मुळात या ठिकाणावरुन उतरणार कसे असा यक्ष प्रश्न पडला होता . पायवाटेच्या बाजूच्या छोटया झुडपांना पकडून एक एक पाय पुढे टाकत होतो . आता एक मोठी सरळ उतरण उतरायची होती . अक्षरशः बुड टेकून हळूहळू सर्वजण पुढे सरकू लागले . प्रत्येकाची नजर पुढचा गडी पाय कुठे ठेवतो , हात कुठे पकडतो याकडे होती . पुढच्याची कृती मागचा करीत होता . हा जीवघेणा खेळ सुमारे तासभर सुरू होता . माझ्या माहितीने स्थानिक लोक सोडले तर या जागेवरून कोणीही जाण्याचे धाडस केलेले नसावे . एवढा अवघड रस्ता आहे . दोन तास कसरत करुन शेवटी नदीपात्रात खोल दरीत उतरलो . आता पुढे पात्रातील मोठे दगडगोटे तुडवत चालणे भाग होते . 



       नदीच्या पात्रातून काही प्रमाणात पाणी वाहत होते . एका ठिकाणी सुंदर धबधबा पहायला मिळाला . सर्वानी हातपाय धुतले . काहींनी अंघोळ केली . अर्थात फोटो काढायला कुणाला सांगावे लागले नाही . बराच वेळ घालवला . सुरजची तर एक चांगली झोप झाली . पुढचा प्रवास सुरू झाला. अभिजीत सर व मी पुढे गेलो होतो . आम्हाला एक नैसर्गिक घसरगुंडी व पाण्याचा डोह दिसून आला . सरांनी ट्रेकर्स या जागी कसा आनंद घेतात हे सांगितलं . मग काय सुरजने पहिली उडी घेतली . मग पाठोपाठ अतुल , निखील , अभिजीत सर , मिलिंद सर आणि अन्य जणांनी त्याचा आनंद घेतला . साहेबांची गगनभेदी ललकारी आणि मनमुराद घसरगुंडी हा मिलाप चांगलाच जुळला होता .  सर्वाचे व्हीडीओ करण्याचे भाग्य मला लाभलं . अर्धा पाऊण तासाचा वेळ गेल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली 



        नदीतील दगड गोटे मागे टाकीत उडया घेत घेत चालू लागलो . मध्येच रामकुंडाकडे जाणारी दरी लागली . पुढच्या ट्रेकचे नियोजन येथेच ठरले . नदीत ठिकठिकाणी खेकडे पकडायचे टोपली दिसून आली . त्याचा आकार फुलदाणीसारखा होता . याचे काही तरी सुशोभिकरण करता येईल असे वाटल्याने तो घेण्याचा मोह आवरता आला नाही . आता आभाळात ढग तरळले होते . पावसाची झिरझिर पडू लागली त्यामुळे दगडांवरचे पाय सटासट घसरू लागले . त्यामुळे चालण्याचा वेग मंदावला . बरचसं अंतर चालून गेल्यावर नदीचे पात्र सोडून जंगलाची वाट धरली . अर्धा तासातच शिवथरघळीत पोहचलो . सर्वजण समर्थ रामदास स्वामीच्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहचलो . आरती व मनाचे श्लोक म्हटले . ध्यानधारणा झाली आणि सर्वजण माघारी फिरलो . 



एव्हाना गाडया आल्या होत्या त्यातून पुन्हा उंबर्डेत आलो . तोपर्यंत चार वाजले होते . हातपाय धुवून सर्वच तयार झाले . एका गाडीचे चाक पंक्चर झाले होते . मामांना मी मदत केली . दुसरे चाक बसवले . तोपर्यंत जेवण तयार होतेच . पंगती पडल्या . सर्वजण मनसोक्त जेवले . जेवतानाच सर्वांनी ट्रेकचे अनुभव व्यक्त केले . जाधव  साहेबांच्या नियोजनामुळे ट्रेक पूर्णत्वाला गेला होता . सर्वात शेवटी माझे अनुभव व्यक्त करुन सर्वाचे आभार मानून एका अतिशय अवघड पण यशस्वी ट्रेकची सांगता झाली . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक