॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची
- दशरथ ननावरे [श्रीमंत ] , इतिहास अभ्यासक
किल्ले रायरेश्वर ते शिवथरघळ
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा .... ' असे महाराष्ट्राचे वर्णन अभिमानाने केले जाते . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या पर्वतरांगातून सामावलेली महाराष्ट्राची भूमी म्हणजे एक स्वर्गच ! स्वराज्य संकल्पनेची शपथ ज्या भूमीवर गर्जली तो किल्ले रायरेश्वर ते
सह्यशिखरातील पौराणिक पवित्र ठिकाण असलेले क्षेत्र शिवथरघळ हा निर्भिड अरण्यातील एक साहसी , शारीरिक कस लावणारा , विलोभणीय निसर्गाचे दर्शन घडवणारा रेंज ट्रेक .
सह्याद्रीचा पर्वत असो वा त्याच्या उपरांगा मधील विविध डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटा असो , त्या वाटेने मार्गक्रमण करायचं .सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेले ऐतिहासिक गड किल्ले , डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे अथवा जंगलाच्या आडवाटा असो त्याच्याशी आपलेपणाचं नातं जोडायचं हा 'शिवसह्याद्री पायदळ ' ट्रेकर्सचा छंदच . आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही प्रतिसाद दिला नाही असं आजवर तरी घडलं नाही . नेहमीप्रमाणे त्यांनी ही मोहिम करण्याचे निश्चित केले .
ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे साडेतीन वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे चार वाजता वाई विश्रामगृहात जमवाजमव झाली . घाईगडबडीतही अभिजीत सरांनी यामा बाईक राईडची हौस पूर्ण करून घेतली . तसं सरांना विविध प्रकारच्या बाईक आणि सायकल राईडची भारी हौस . मौजमजा आणि जीवनाचा आस्वाद अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही घेता येतो हे त्यांच्याकडे पाहून जाणवते . पटापट आवराआवर करून श्रीपाद जाधव साहेब , पुण्याहून आवर्जुन आलेले अभिजीत गोरे , मिलिंद दगडे , कपील दगडे , सचिन देशमुख , अतुल गाढवे, निखिल , अभिजीत आणि मी जीपमधून रायरेश्वराच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात तासाभराचा प्रवास करून खावली मार्गे खिंडीत पोहचलो .
गडाच्या पायथ्याला थंड वाऱ्यानं अंगावर शहारा आला . अंधार दाटलेलाच होता तरीही गाडीच्या प्रकाशझोतात फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही . थंड हवेचा गारवा अंगाला झोंबत होता . तशातच रायरेश्वराचा डोंगर चढायला सुरुवात केली . थोडया चालीनंतर मुरमाड मातीच्या पायऱ्या चढुन छोटी वळणे घेत लोखंडी सीडीच्या पायऱ्या चढू लागलो . मी पटपट वरती पोहचलो इतरांचा व्हीडीओ करायचा होता . अंधारातच तो केला . सर्वजण गडाच्या माथ्यावर पोहचलो . थंड हवेचा गारवा आणखी जाणवला . पण पहाटेचा गार वारा , कुठून तरी येणारा पक्षांचा आवाज , प्रसन्न आणि आल्हादायक वातावरण यामुळे सर्वाचेच मन तल्लीन झाले .
आजूबाजूचा हिरवागार परिसर न्याहाळत रमत गमत पुढे चालत होतो . वाऱ्याने हिरव्यागार गवताची पाती डुलत होती . चवर, सोनके , मिकीमाऊस, लालटाका यासह अनेक प्रकारची रानफुल आता सुकलेली होती .बघता बघता तलावाच्या बाजूने वळसा घालून पुढे गेलो . काही अंतरावर पाण्याचे टाके होते . गोमुखातून टाक्यात पाणी पडत होते . स्वच्छ , निर्मळ पाण्यात टाक्याचा तळ दिसत होता . आमची चाहूल लागताच खेकड्यांनी दगडाच्या कपारीकडे पळ काढला आणि आम्ही मंदिराकडे !
रायरेश्वर देवालयाच्या प्रांगणात प्रवेश केला . शिवालयाचे दगडी बांधकाम आजही मजबूत आहे . पूर्वीच्या छताची जागा पत्र्याने घेतली आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंग व पिंड आहे . शेजारी दगडी पणतीचा दिवा तेवत होता . अगरबत्तीचा वास सर्वत्र दरवळत होता . 'ओम नमः शिवाय ' चा जप आतून कानावर पडत होता . सर्वानी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले . शंकराची आरती सर्वांनी म्हटली याबाबतीत जाधव साहेब मोठे तरबेज ! मंदिरात शिवकालीन इतिहासाची जुजबी माहिती आणि शिवरायांच्या स्वराज्य शपथेचा फोटो लावलेला आहे . मंदिराच्या समोरच एका चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी राजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. शेजारीच छोटेखानी शाळेची इमारत आहे .
दर्शन घेऊन पश्चिमेच्या दिशेने पायवाटेने चालू लागलो . भाताच्या शेतीची जागा गव्हाच्या पिकाने घेतलेली . त्याला वळसा घालून पुढे गेल्यावर रायरेश्वरावरील वस्ती आहे . इथे काही मोजकीच घरे आहेत .पावसामुळे ती झावळयांनी व कुडांनी झाकलेली तशीच होती . कुत्र्यांच्या आवाजाने आम्ही आल्याची कानकून वस्तीवाल्यांना झाली . जाता जाता सोमनाथ जंगमांना आवाज देऊन पुढे चालतो झालो . तेथेच गोपाळरावांच्या घरी चहा घेतला . गरमागरम पोहे खात चर्चा झडल्या . तेवढयात भोरवरून तीघे सहकारी पोहचले . मग मागच्या ओघळीच्या वाटेने रस्त्यावरची माती तुडवत आणि मागच्या ट्रेकच्या वेळी कोणत्या रस्त्याने गेलो याचा अंदाज लावत चाललो होतो . सोबत वस्तीवरचा एक कुत्रा होताच . केसाळ शरीर अन् झुबकेदार शेपटी यामुळे गडयाचा रुबाब वाढला होता . नेहमीप्रमाणे गडाच्या टोकापर्यत हा सोबत करणार याची खात्री होती . बरेच अंतर चालल्यानंतर एका मोठ्या शिळेवर उभे राहून फोटो काढले . तासाभराच्या अंतरात रायरेश्वराचे भले मोठे पठार मागे टाकले होते .
वाटेत कार्वीच्या झाडांनी वेढा टाकला होता . त्यातून मार्ग काढायचा म्हणजे मोठे दिव्य . गतवेळी कार्वीच्या झाडांमुळेच अंगावर फोडया उमटल्या होत्या . त्याचा चांगलाच त्रास जाणवला होता . त्यामुळे भीती वाटत होतीच . रस्त्यात उगीच कार्वी उगवली असा विचार राहून राहून डोक्यात येत होता . कसाबसा रस्ता काढीत वाट मागे सारत होतो . अनेक वेडीवाकडी वळणे घेत , चढ उतार पायाखाली घेऊन पुढे सरकत राहिलो . आता यापुढे खरी कसोटी होती . भला मोठा डोंगर उतार तोही खडा उतार उतरून अस्वल खिंडीत पोहचायचे होते . ट्रेकच्या पहिल्या दिवसाचा हा टप्पा म्हणजे जीवघेणाच ! कापशीचा बदर म्हणून ओळखली जाणारी ही वाट म्हणजे अंगावर काटा आणणारी होती . एकमेकांच्या साथीने कुठं सरळ , कुठं वाकडं तर कुठं उलटं होऊन खाली उतरावं लागत होतं तेही अतिशय संथगतीने . या तीव्र उतारावरील निसरड्या वाटेवर पाय घसरला तर थेट दरीच्या तळाशी पोहचणार हे निश्चित होतं . त्यामुळे ज्या कार्वीचा तिटकारा वाटत होता ती कार्वीच आता आधाराला धावून आली होती . तीच्या साथीनं सांभाळूनच पाऊल पुढे पडत होतं . तास अर्धा तास नव्हे तर तब्बल चार तास हा बदर उतरायला लागले . शेवटचा एक टप्पा तर मोठा अवघड होता . छोट्या झुडपांच्या आधाराने तोही उतरला आणि पुढील जंगलातून वाट काढीत अस्वल खिंडीत पोहचण्यासाठी आतुरतेने चालत होतो . खालून पुढचे वाटाडे आवाज देत होतेच . सकाळी दहा वाजता खिंड गाठू असा बांधलेला अंदाज पुरता खोटा ठरला होता . दुपारचे एक वाजता खिंडीत पोहचलो . थोडा वेळ थांबून पाणी प्राशन केले . एका मोठया दगडी शिळावर बसून फोटो घेतले . जास्त वेळ घालवून चालणार नव्हते . पुढचा बराच लांबचा पल्ला गाठायचा होता . त्यामुळे रायरेश्वरावरील वाटाडेस्वामींचा निरोप घेऊन खिंडीतील जंगलातून चालते झालो .
या ट्रेकला भोरचे तीन शिक्षक सहभागी झाले होते . रस्त्याने गमतीजमती करीत त्यांचा ठरलेला डायलॉग कानी पडायचा ... ' जिलेबी देऊ पण खाल्लीच पाहीजे ' मला तर त्याचा मतितार्थ कळतच नव्हता . पण मनोरंजन भारीच झाले . वास्तविक हे तीघे पहिल्यांदाच आमच्या सोबत ट्रेकला आले होते . पण तग धरून चालत होते हे विशेष . अजूनही तास दीड तास प्रवास करून मानटवस्तीत दुपारच्या जेवणाचे नियोजन होते . जंगलाचा भाग उतरून नदीच्या कडेने चालत राहिलो . आता शिब्रा टोक डाव्या हाताला टाकून चालू लागलो . पुढे नदीच्या पात्रात थंड पाण्याने हातपाय धुवून फ्रेश झालो . लोक दमले होते पण पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता . आता एक मोठी टेकडी चढून जायचे होते . खडी चढण होती कशीबशी पाऊले पुढे टाकत होतो . वरच्या टप्प्यावर जाऊन मागच्या सहकाऱ्यांची वाट पहात बसलो . सर्वजण आल्यावर पुढे चालते झालो .
आता मोहन गडाच्या पायथ्याशी मानटवस्ती दिसू लागली होती . टेकडीच्या उताराने पटापट उतरू लागलो . खरं तर सगळेच कंटाळले होते . जेवण करून पुढे निघायला चार वाजले तर मोहनगड करून उंबर्डेला मुक्कामी पोहचणे अशक्य असल्याने जाधव साहेबांनी माझ्याशी चर्चा केली . सर , पुढचं नियोजन काय करायचं . मानटवस्तीत मुक्काम करून पहाटे लवकर उठून शिवथरघळला पोहचू असाही विचार समोर आला . मी म्हटलं सर्वांचा विचार घेऊन ठरवू . साहेबांनी तिथेच गवतात मांडी घालून ठाण मांडलं . मोहनगडावर येणारा माणूस आलाय का? यासाठी फोन करू लागले . पण फोन लागत नव्हता . तेवढयात सर्वजण आलेच . आता मुक्काम जर अलिकडे झालाच तर बरच झालं म्हणून मलाही खूप आनंद वाटत होता . पण साहेबांनी दमलेल्या लोकांच्या नावाच्या यादीत अभिजीत सरांचे पहिले नाव घेतले अन् सगळा डाव इस्कटला . हार मानतील ते अभिजीत सर कसले ? या माणसात नेहमी वेगळच रसायन पहायला मिळतं . प्रचंड झच्छाशक्ती ओतप्रोत भरलेली मला दिसली . आणि साहेबांनी त्यांचेच नाव घेतल्याने सरांनी आता काही झालं तरी ठरलेल्या ठिकाणीच मुक्कामी जायचं अशी स्पष्ट भूमिका घेतली . ठरल्याप्रमाणे ट्रेक करायचा असा जोर धरला . त्यामुळे मुक्काम अलिकडे होणार या आमच्या आनंदावर विरजन पडले . गपगुमान झपाझप पाऊले टाकत मानटवस्ती गाठली . जेवण तयारच होतं . चपाती, भाजी , वरण ,भात मस्त ताव मारला . यथेच्छ जेवण झालं . बाहेर अंगणात अंब्याच्या झाडाखाली सहज आडवं पडलो . बघता बघता सगळयांची वामकुक्षी लागली . चार कसे वाजले कळलच नाही .
मोहनगडाकडे आगेकूच करायचे होते . रात्री मुक्कामी जाण्यासाठी अर्धा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे सर्वांना पटापट आटपायला सांगीतलं . थंडीचे दिवस असल्याने झोरे कुटुंबियांसाठी आणलेले स्वेटर त्यांच्या सूपूर्त केले . सर्वानी मोहनगडाच्या चढणीला सुरुवात केली . हा गड पहायला सोपा वाटतो मात्र वाट वळणा वळणाने असल्याने चांगलाच घाम निघतो . मावळतीच्या दिशेने आम्ही वर चढलो . डोंगराला गवत कापणीची कामे सुरुच होती . भारा बांधण्यासाठी झाडाखाली एक जण कळकाच्या पातळ कांब्या काढत बसले होते . शेजारीच झाडाच्या खोबणीत लगोर अडकवलेली होती . मी उगीचच हातात घेऊन झाडावरच्या पक्षावर नेम धरला . शेजारी उभ्या असलेल्या गणेशाला फोटो काढायला लावला . वास्तविक त्यात पकडलेला दगड चार फूट पण लांब गेला नाही पण मोठ्या शिकाऱ्याचा आव आणला होता . पुढे मजल दरमजल करीत जंगलातील रस्ता तुडवत गडाकडे धाव घेत होतो . सर्वानाच घाई झाली होती . अंधार पडेपर्यंत गड जवळ केला होता . जननी मातेचे दर्शन घेऊन पुढे जाणे गरजेचे होते . पण आता अंधारातून मार्ग काढायचा होता . रस्ता दाखविण्यासाठी येणारा माणूस आलाच नव्हता . त्यामुळे मानटवस्तीतीलच वाटाडयांना सोबत घ्यायचे ठरले . किमान पाथरटाक्यापर्यंत पोहचता आले तर तिथेही मुक्काम करता येईल यावरही विचार झाला . पण उंबर्डे मुक्कामी त्याची खबर देणे गरजेचे होते . तसा प्रयत्न केला मात्र प्रकाश रावांचा फोन लागला नाही .
साहेबांनी सर्वांना सोबत चालण्याच्या सूचना केल्या . प्रत्येकाला बॅटरी काढायला लावली . काहींनी डोक्याला तर काहींनी हातात बॅटरी घेतली . काजवे चमकावे तशा विजेऱ्या रात्रीच्या अंधारात चमकू लागल्या . त्याच्या उजेडातच गड उतरायला सुरुवात केली . एव्हाना पाय चांगलेच भरून आले होते पण इलाज नव्हता . काही करून मुक्कामाला पोहचणे गरजेचे होते . एकमेकांशी कुजबुज करीत गड मागे टाकण्याचे काम सुरु होते . रस्त्याच्या बाजूच्या कळकाच्या बेटातून पानांची सळसळ ऐकू येत होती . मागे गडावर मुक्कामी गेलेल्या पथकातील काही जण आपल्या सहकार्यांना आवाज देत होते पण खालून वर चाललेले आम्हाला कोणीच भेटले नाही . तासाभराने खाली उतरुन जंगलाचा भाग संपला . आता नदी पार करून पुन्हा उंबर्डेच्या दिशेने डोंगर चढणे भाग होते . आता तर पायाचे तुकडे पडणेच उरले होते . मनात आले एखादी गाडी आली तर बरं होईल पण साहेबांपुढे हा विषय काढणे म्हणजे अवघडच . तसं मी अतुल जवळ बोललो पण त्याचही साहेबांना बोलण्याचं धारिष्ठय झाले नाही . खालच्या उतरणीला एक गाडी आली . कपील सरांसह कंटाळलेले काही जीव त्यात विसावले . बाकीच्यांनी पुढचा रस्ता धरला . रात्रीच्या अंधारात मजल दरमजल करीत रात्री साडेदहा वाजता उंबर्डे गावात पोहचलो . ओसरीला अक्षरशः अंग टाकून दिले . पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाण्याने स्वच्छ हातपाय धुतले . सुरजने पायाचे स्ट्रेचिंग केले त्यामुळं थोडं मोकळं मोकळं वाटलं . ताटं वाढायला घेतली आणि सर्वाची पंगत झडली . चविष्ट जेवणाचा आस्वाद सगळयांनी मनसोक्त घेतला . ओसरीला चटईवरच सर्वजण पहुडले. डोंगरदऱ्यातून सुमारे तीस किलोमीटरची पायपीट करून दमलेले जीव धरणीमायच्या कुशीत कधी निद्रीस्त झाले कळलच नाही .
ट्रेकचा दुसरा दिवस तसा उशीराच सुरु झाला . कारण सगळेच उशीरा उठले . सर्वाचा चहा नाष्टा झाला . साडेनऊला निघण्याची तयारी झाली . एका घरासमोर मालक असल्यासारखे रुबाबदार फोटो काढले . पाळे दऱ्यातून खोल दरीत उतरायचे होते . वाट खूप अवघड आहे हे अगोदरच निखिलने सांगीतले होते . पण उत्सुकता लागली होती . सुरुवातच दाट झाडीतून झाली . वाट काढीत पुढे चाललोच होतो . एका वळणावरुन ओढयात उतरलो . हा मोठया धबधब्याचा भाग होता . इथं फोटोसेशन होणार नाही असं झालच नसतं . ती हौस पूर्ण केली आणि छोट्या चढणीने पुन्हा जंगलात प्रवेश केला पण एकदम दरीच्या कडेने . सावकाश पुढे चालते झालो . आणि पुढे अतिशय अवघड टप्पा समोर आला . एकतर एका बाजूला खोल दरी , त्यात वाट निसरडी होती . खाली नजर टाकली तर डोळे गरगर फिरत होते . मुळात या ठिकाणावरुन उतरणार कसे असा यक्ष प्रश्न पडला होता . पायवाटेच्या बाजूच्या छोटया झुडपांना पकडून एक एक पाय पुढे टाकत होतो . आता एक मोठी सरळ उतरण उतरायची होती . अक्षरशः बुड टेकून हळूहळू सर्वजण पुढे सरकू लागले . प्रत्येकाची नजर पुढचा गडी पाय कुठे ठेवतो , हात कुठे पकडतो याकडे होती . पुढच्याची कृती मागचा करीत होता . हा जीवघेणा खेळ सुमारे तासभर सुरू होता . माझ्या माहितीने स्थानिक लोक सोडले तर या जागेवरून कोणीही जाण्याचे धाडस केलेले नसावे . एवढा अवघड रस्ता आहे . दोन तास कसरत करुन शेवटी नदीपात्रात खोल दरीत उतरलो . आता पुढे पात्रातील मोठे दगडगोटे तुडवत चालणे भाग होते .
नदीच्या पात्रातून काही प्रमाणात पाणी वाहत होते . एका ठिकाणी सुंदर धबधबा पहायला मिळाला . सर्वानी हातपाय धुतले . काहींनी अंघोळ केली . अर्थात फोटो काढायला कुणाला सांगावे लागले नाही . बराच वेळ घालवला . सुरजची तर एक चांगली झोप झाली . पुढचा प्रवास सुरू झाला. अभिजीत सर व मी पुढे गेलो होतो . आम्हाला एक नैसर्गिक घसरगुंडी व पाण्याचा डोह दिसून आला . सरांनी ट्रेकर्स या जागी कसा आनंद घेतात हे सांगितलं . मग काय सुरजने पहिली उडी घेतली . मग पाठोपाठ अतुल , निखील , अभिजीत सर , मिलिंद सर आणि अन्य जणांनी त्याचा आनंद घेतला . साहेबांची गगनभेदी ललकारी आणि मनमुराद घसरगुंडी हा मिलाप चांगलाच जुळला होता . सर्वाचे व्हीडीओ करण्याचे भाग्य मला लाभलं . अर्धा पाऊण तासाचा वेळ गेल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली
नदीतील दगड गोटे मागे टाकीत उडया घेत घेत चालू लागलो . मध्येच रामकुंडाकडे जाणारी दरी लागली . पुढच्या ट्रेकचे नियोजन येथेच ठरले . नदीत ठिकठिकाणी खेकडे पकडायचे टोपली दिसून आली . त्याचा आकार फुलदाणीसारखा होता . याचे काही तरी सुशोभिकरण करता येईल असे वाटल्याने तो घेण्याचा मोह आवरता आला नाही . आता आभाळात ढग तरळले होते . पावसाची झिरझिर पडू लागली त्यामुळे दगडांवरचे पाय सटासट घसरू लागले . त्यामुळे चालण्याचा वेग मंदावला . बरचसं अंतर चालून गेल्यावर नदीचे पात्र सोडून जंगलाची वाट धरली . अर्धा तासातच शिवथरघळीत पोहचलो . सर्वजण समर्थ रामदास स्वामीच्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहचलो . आरती व मनाचे श्लोक म्हटले . ध्यानधारणा झाली आणि सर्वजण माघारी फिरलो .
एव्हाना गाडया आल्या होत्या त्यातून पुन्हा उंबर्डेत आलो . तोपर्यंत चार वाजले होते . हातपाय धुवून सर्वच तयार झाले . एका गाडीचे चाक पंक्चर झाले होते . मामांना मी मदत केली . दुसरे चाक बसवले . तोपर्यंत जेवण तयार होतेच . पंगती पडल्या . सर्वजण मनसोक्त जेवले . जेवतानाच सर्वांनी ट्रेकचे अनुभव व्यक्त केले . जाधव साहेबांच्या नियोजनामुळे ट्रेक पूर्णत्वाला गेला होता . सर्वात शेवटी माझे अनुभव व्यक्त करुन सर्वाचे आभार मानून एका अतिशय अवघड पण यशस्वी ट्रेकची सांगता झाली .
- दशरथ ननावरे ( श्रीमंत )
इतिहास अभ्यासक
मस्त लिहिलंय सगळं सर खरंच हा एक सगळ्यांसाठी अप्रतिम अनुभव होता🙏
ReplyDeleteसर्व ट्रेक च समोर उभा केला पुन्हा 👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर पूर्ण ट्रेक समोर उभा राहिला
ReplyDeleteधाडसी ट्रेक, आणि सुंदर वर्णन
ReplyDeleteसुंदर वर्णन केले आहे.
ReplyDelete👌मस्त सर सुंदर वर्णन केले आहे.
ReplyDeleteसाहेब खुप छान अगदी परिपूर्ण वर्णन आहे ट्रेकचे👌👌
ReplyDeleteसाहेब खुप छान अगदी परिपूर्ण वर्णन आहे ट्रेकचे����
ReplyDelete