Pages

Monday, 21 September 2020

॥ विचारवेध॥ - शिवबा घडवायचा असेल तर ...

 


  ॥ विचारवेध  ॥ 

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

- शिवबा घडवायचा असेल तर ...

        आदर्श माता माता म्हणून नावलौकिक मिळवावा ही प्रत्येक आईच्या मनातील इच्छा !  पण त्यासाठी स्वकर्तृत्वाने प्रयत्न करणाऱ्या माता दुर्मिळच म्हणाव्या लागतील. आपल्या मुलांनी खूप शिकावे , मोठा अधिकारी व्हावे. त्याने कर्तृत्ववान यशस्वी पुरुष म्हणून समाजात नाव मिळवावे. हे प्रत्येक आईचे स्वप्न ! पण हेच स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी सुसंस्कारांच्या फुलांची माळ किती मुलांच्या गळ्यात पडते हा चिंतनाचा विषय आहे. 

      भारत वर्षामध्ये घडलेल्या अनेक थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किती माता आपल्या मुलांना घडवतात. समाजात सर्वच स्तरातून शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. शिवाजी हे नाव जरी उच्चारले तरी अंगात वीरश्री संचारते. ही महानता शिवरायांची आहे. त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊची आहे. शिवरायांच्या चरित्रात कार्यकर्तृत्वाचा व त्यांच्या जडणघडणीमध्ये जिजाबाईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या मातेने बालपणापासून आपल्या मुलावर अत्यंत उत्तम संस्कार केले . शहाजी राजांसोबत लग्नानंतर अनेक अडचणींना तोंड देत ही आई अत्यंत खंबीरपणे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ते काही काळ बंगळूर या ठिकाणी शहाजी राजांकडे राहिले. शहाजी राजांनी युद्धकलेचे शिक्षण शिवबांना दिले. शहाजीराजांनी दिलेल्या युद्ध कलेचा जिजाऊंनी कसून सराव घेतला.  राजांना न्याय नीतीचे शिक्षण दिले.  जिजाऊंनी स्वराज्यातील अनेक न्याय निवाडे शिवबांना बरोबर घेऊन केले.  त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहिल्या. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट धाडसाने करायला शिकवली . साहसी कार्याचा पाठीवर शाबासकीची थाप देऊन सन्मान केला.  स्वराज्य कार्यासाठी प्रेरित केले. 

         याउलट आजची आई आपल्या मुलांशी अशी वागते का?  आज आई मुलाला सांगते , बाळ झाडावर चढवू नको,  मातीमध्ये खेळू नको आणि तरीही एखादी गोष्ट मुलाने आवडी खातर केली तर त्याबद्दल शाबासकी ऐवजी पाठीवर चोप दिला जातो.  मुलाच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीची भीती निर्माण केली जाते.  बेगडी वात्सल्यापोटी त्याच्या निष्पाप मनावर , बालवयातील खेळण्यावर निर्बंध घातले जातात . आणि घरामध्ये शिवबा घडण्याची अपेक्षा धरतात.  या विचारांनी कोणतीही आई एखादा शिवाजी निर्माण करू शकत नाही.

         जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना वीर पुरुषांच्या कथा सांगून धार्मिकतेचे आणि नीतिमत्तेचे उच्चकोटीचे अधिष्ठान मिळवून दिले . दऱ्याखोऱ्यातील गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आपलेसे करायला शिकविले. जिजाऊंनी पुण्याला बाल शिवबाच्या हातात नांगर देऊन शेती करण्यास सुरुवात केली.  छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्याचे बाळकडू पाजले.  इ.स. १६३० ते १६७४ या आपल्या अखंड आयुष्यात जिजाऊंनी शिवबाची पाठराखण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना हिरीरीने शिकवली, संस्कार घडविले. 

 आजच्या पालकांना स्वतःच्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही . संस्कार घडवणे तर दूरच . खेडोपाड्यात दिवसभर रानात कष्ट करणारी स्त्री घर कामात आणि शेतात देहभान विसरते. कामाच्या व्यापात मुलांना शिकविणे दुरापास्त होते . शहरी भागातही वेगळी परिस्थिती नाही. आई वडील दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. मुलं मात्र पाळणाघरात वाढते. अशी मुले मातृत्वाच्या प्रेमापासून वंचित राहतात . या मुलांवर संस्काराची बीजे पेरली जातील का ? हा विवंचनेचा भाग आहे . पैशाच्या मागे धावणारी दुनिया स्वतःच्या मुलांच्या भवितव्याबाबत निष्काळजी वाटते . त्यांच्या हातून एखादा शिवबा घडेल अशी अपेक्षा धरणे कितपत योग्य आहे . 

     एकदा कोकण भटकंती करताना सिंधुदूर्ग किल्ला पाहण्यासाठी मित्रांसमवेत गेलो. खर तरं महाराजांचे अनेक किल्ले पाहताना जी ओढ मनामध्ये असते तीच यावेळीही होती . किल्ला समुद्रातील बेटावर बांधलेला . तीथे पोहचायचे  तर छोटया बोटीतून किल्ल्याच्या तटापर्यंत जावे लागते . तिकीट घरातून तिकीट घेऊन आम्ही सर्वजण एका बोटीत बसलो . नावाडयाला बोट चालू करायला सांगीतली . पण नावाडी म्हणाला , ' सर , वीस प्रवासी झाल्याशिवाय बोट नेता येणार नाही . मग काय आणखी प्रवाशांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता . माझे डोळे तर किनाऱ्यावर येणाऱ्या इतर वाहनांकडे लागले होते . तेवढयात एक जीप आल्याची दिसली . त्यातून काही प्रवासी उतरले . तिकीट घेऊन तेही लगबगीने बोटीच्या दिशेने आले . आता आपल्याला निघता येणार याची खात्री झाल्याने बरं वाटलं . नवीन सहकारी काही महिला तर काही पुरुष मंडळी बोटीत विसावले . त्यांच्याही मनात किल्ल्याविषयी कुतुहल होते हे जाणवले . त्यांच्या एकमेकांशी गप्पा सुरू होत्या . त्यातीलच एक महिला किल्ल्याकडे पाहून म्हणाली , केवढा बेलाग किल्ला आहे . किती मजबूत आणि समुद्रात असूनही विस्तृत आहे . एवढा प्रचंड वाटणारा हा किल्ला कसा बांधला असेल ? आणि हे सर्व घडवून आणणारे शिवाजी राजेही कसे असतील ? खरचं शिवरायांचं कार्य महानच . नाहीतर आजचे शिवाजी बघा , नुसते नावापुरतेच . ( समोर बसलेल्या तीच्या नवऱ्याचे नाव शिवाजी होते ) त्यांचा हा संवाद ऐकून मला रहावले नाही . मध्येच त्यांना थांबवत मी म्हणालो , 'ताई , शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही . त्यांचे कार्य खरोखर महान आहे . शिवचरित्र आपण समजून घेत नाही हे दुर्देव ! पण शिवाजी हे नाव केवळ नावाने का होईना पण घराघरात पोहचले आहे . पण आधुनिक काळात प्रत्येकाच्या अंगणात शिवबा घडवायचा असेल तर घराघरात जिजाऊ घडली पाहिजे . आणि ती जबाबदारी प्रत्येक मातेने उचलली पाहिजे . यावर बोटीतील सर्वच महिला विचारमग्न झाल्या . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास- अभ्यासक 

.................................................................

3 comments: