Pages

Monday, 31 August 2020

॥ विचारवेध ॥ चेतनाभूमी नायगाव

 


॥ विचारवेध ॥ 

दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक


चेतनाभूमी नायगाव ...  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मभूमी ...

     ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव म्हणजे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेची चेतनाभूमी . खंडाळा तालुक्यातील नायगाव हे तसं खेडेगाव पण सावित्रीबाईंच्या जन्माने पुनित झालेलं हे ठिकाण आजही महाराष्ट्राला नव्हे तर जगाला प्रेरणादायी ठरत आहे . तसचं ते पर्यटनस्थळ म्हणूनही विकसीत होत आहे . 

       महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला याच बरोबर स्त्री पुरुष समता आणि जातीयता निर्मूलन इत्यादी क्षेत्रातील मोलाचे कार्य केले. या कार्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे नायगाव येथील जन्मघर ” राज्य संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे. जन्मघराच्या जतनापूर्वी हि जागा दुर्लक्षित होती. नंतर महाराष्ट्र शासनाने या वास्तूच्या तत्कालीन स्वरूपानुसार तिची पुनर्निर्माण केला.

ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.

महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या संघर्षमय  समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित उद्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्हयातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री हि कन्या जन्मली . त्याची हि एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जरात सुरु केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून जोतीराव बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या  होत्या .

    सावित्रीबाई आणि जोतीराव यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत  नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी जोतीरावांशी विचारविनिमय करून यशवंतलाच दत्तकच घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.

     जोतीरावांबरोबर सावित्रीबाईंना विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली जोतीरावांच्याच मनाने स्त्रियांनी शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ  केला होता. जोतीरावांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबद्च विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य .  पण जोतीरावांच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच  म्हणजे सावित्रीबाईपासूनच केला. शेतात काम करतांनाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .

     १४ जानेवारी १८४८ साली जोतीरावांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बायकांनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.

     ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथील राष्ट्रीय स्मारक व शिल्प सृष्टीस भेट देण्यासाठी राज्यातून आणि राज्या बाहेरुन हजारो पर्यटक येत असतात . पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी तसेच त्यांना फुले साहित्याचा अभ्यास करता यावा यासाठी राज्य शासनाने येथे पर्यटक निवास उभारले आहे मात्र काही अपूर्ण कामामुळे हे पर्यटक निवास धूळ खात पडले आहे . याचे उद्घाटन होऊन ते वापरात यावे अशी अपेक्षा पर्यटक व नायगाव ग्रामस्थांची आहे .

        बहुजनांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी व त्यांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या फुले दाम्पत्यांचे नायगाव ता . खंडाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे . त्याचबरोबर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची महती दर्शवणारी शिल्पसृष्टीही निर्माण केली आहे . देशभरातून हजारो पर्यटक येथे राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी वर्षभरात येत असतात . त्यांच्या राहण्याची सोय व्हावी तसेच फुले दाम्पत्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करता यावा यासाठी स्मारक विकास आराखडयात पर्यटक निवासाचा समावेश करण्यात आला होता . राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या इमारतीच्या उभारणीस सुरवात केली यासाठी डिसेंबर २०११ मध्ये मंजूरी देऊन पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता . या इमारतीत पर्यटकांसाठी राहण्याच्या खोल्या , सुसज्ज ग्रंथालय तसेच अभ्यास केंद्राची सुविधा करण्यात येणार आहे . इमारतीचे बांधकाम बहुतांशी पूर्ण असले तरी अदयाप इमारती बाहेरील बाग , पाण्याची व्यवस्था तसेच अन्य किरकोळ कामे अपूर्ण आहेत . त्याचबरोबर गावापासून या पर्यटन निवासापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही . या रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे . यावर प्रशासनाने तोडगा काढला नाही . त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत अद्याप वापरात आली नाही . रस्त्यासह उर्वरित कामे कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे . 

॥ हे जरुर पहा ....

   नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक हा एक ऐतिहासिक ठेवा आहे . त्यांच्या जन्मघरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अस्सल छायाचित्र , काही स्वलिखित पत्रे आहेत तसेच स्वयंपाकघर त्यामध्ये तत्कालीन स्वयंपाक व पाण्याची भांडी , चूल व इतर साहित्य आहे . शेजारीच माजघर आहे . त्याशेजारी तळघर असून त्यात धान्याची कोठी आहेत . हा ऐवज जसाच्या तसा जपून ठेवलेला आहे . त्याबरोबरच फुले दाम्पत्यांच्या जीवनाशी निगडीत विविध साहित्य येथे पहायला मिळते . ॥ 

॥ सावित्री शिल्पसृष्टी ...

   राष्ट्रीय स्मारकाच्या शेजारी स्वतंत्र शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे . यात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची स्मृति  जागृत ठेवणारे शिल्प घडविण्यात आली आहेत . यामध्ये मुलींची पहिली शाळा , हरिजनांसाठी  घरातील रिकामा केलेला हौद , केशवपन विरोधी काढलेला मोर्चा , विधवा विवाह पुरस्कृत कार्य , अनाथ मुलांचे पाळणाघर , महात्मा फुले यांचा अंत्यविधी यांसह विविध चौदा शिल्प रेखाटलेली आहेत . ॥ 


॥ सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे . पण पर्यटक निवास इमारत अपूर्ण असल्याने त्यांना थांबता येत नाही . उर्वरित कामे पूर्ण करण्यासह ग्रंथालय व अभ्यासकेंद्र लगेच सुरू करण्यात यावे त्यामुळे फुले दाम्पत्यांचा कार्याचा अभ्यास करून त्याचा प्रसार होणे सोईचे ठरणार आहे ॥ 


॥ ऑडीटोरियल रुम - सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य , त्यांचा धगधगता प्रवास व महात्मा फुले यांचे मानवतावादी विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी शिल्पसृष्टीच्या शेजारील रुममध्ये ऑडीटोरियल सुविधा तयार करून फुले दाम्पत्यांच्या जीवनावरील लघुपट तयार करून त्याचे प्रसारण व्हावे . येथे येणाऱ्या सहलीतील शालेय मुलांना व अनुयायांना ते पाहण्याचा लाभ घेता येणार आहे . ॥

   II एक रस्त्याने जोडणार दोन पर्यटनस्थळे ....

आदय स्त्री समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ते महाराष्ट्राची कुलदेवता काळूबाईचे अधिष्ठान मांढरदेव हे एकाच रस्त्याने जोडण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असल्याने  रस्त्याच्या मंजूरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे .  त्यामुळे राज्यातील पर्यटकांना एकाच वेळी नायगावचे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ पाहता येणार आहे . 

स्त्री शिक्षणाचा पाया रचनाऱ्या व सामाजिक क्रांती घडवून समतेचा संदेश देशाला देणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ही महाराष्ट्राची चेतनाभूमी आहे . तर मांढरदेव येथील कुलदैवत माता काळूबाई हे भक्तांसाठी जागरूक अधिष्ठान आहे . नायगावचे हे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ एकाच मार्गाने जोडावे यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे . त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांना ही दोन्ही ठिकाणे एकाच वेळी पाहता येणार आहे . ॥


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

   इतिहास अभ्यासक 

Sunday, 23 August 2020

॥ विचारवेध ॥ मृत्यूच्या दारातून ...

 

॥ विचारवेध ॥ 

*मृत्यूच्या दारातून ....* 


' का जडला हा रोग मजला , का जडली ही विदिर्ण व्याधी 

 दिसले माझे मरणच मजला , जीवन जगण्या आधी ' 

     कोरोना सारख्या भीषण विषाणूचा सामना करुन मरणाच्या दारातून माघारी आल्याचे समाधान असले तरी देवाघरची वाट कशी बिकट आहे . त्या वाटेवरची पाऊलं कशी जडावतात . आयुष्य म्हणजे काय ? आणि ते व्यतीत करताना माणसाचा स्वभाव कसा असायला हवा याचा प्रत्यक्ष अनुभवच कोरोनाशी लढताना आला . आज केवळ कोरोनाला हरवलं नाही तर प्रत्यक्ष मृत्यूलाच हरवल्याचा अभिमान वाटतो . काळ आला होता पण वेळ आली नव्हती . खरचं अशी वेळ कोणावरही येऊ नये . 

          संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले . सारं जग कोरोनाशी सामना करण्यात व्यस्त आहे . भारतातही मार्चमध्ये शिरकाव झाला . सातारा जिल्हयात कोरोनाचा पहिला रुग्ण खंडाळ्यातच आढळला . आणि ज्याची भीती होती तेच समोर येऊन ठाकले होते . 

   वास्तविक खंडाळा तालुक्यात कोरनाचा प्रसार वाढत असताना त्याची बाधा आपल्या गावात होऊ नये . यासाठी घाटदरे भोसलेवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने गावांमध्ये सर्व काळजी घेतली  होती.  परंतु फोफावणाऱ्या या विषाणूने आमच्या गावात पाय ठेवले . त्यामुळे गावातील लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने संपूर्ण गाव बंदी करणे , सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक औषध फवारणी करणे , लोकांना घराबाहेर पडू नका याच्या सूचना करण्यासाठी  दररोज घराबाहेर पडून मला हे काम करणं गरजेचं होतं. या कामात ग्राम सुरक्षा समिती , ग्रामसेवक , तलाठी , अंगणवाडी सेविका , आशा सेविका , ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोलाची साथ मिळाली . 

   एकतर कोरोनाच्या भयाण भीतीने माणुस माणसापासून दूरावला गेलाय .   संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडत असले तरी दैनंदिन व्यवहारात मानवाला अनेक मर्यादा आल्या आहेत . याच कालावधीत तालुक्याच्या ठिकाण म्हणून खंडाळ्यात जाणं येणं ,  माझ्या वैयक्तिक कामाच्या निमित्ताने, ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने बाहेर फिरावे लागत होते . मी ही काळजी घेऊन वावरत होतो पण मनातून निर्धास्त राहिलो होतो पण काही दिवसानंतर मला थोडा ताप येऊ लागला . खोकल्याने जखडलं .  मनामध्ये शंका राहू नये म्हणून खासगी डॉक्टरांकडे गेलो . आणि उपचारही घेतले. अगदी पुढची काळजी घेण्यासाठी डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांची तपासणी केली. परंतु सर्वच रिपोर्ट नॉर्मल आले.  पण गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरता ताप जायचा, आणि पुन्हा यायचा. काहीतरी बिघडलंय खरं अस वाटायचं म्हणून अशा परिस्थितीत घरीच थांबलो होतो.  आजारी असल्याने पत्नी आणि मुलगी दोघेही काळजी घेत होते.  परंतु तीन-चार दिवसांनी त्यांनाही थोडा ताप आल्याचं दिसून आलं . मग मात्र मी कोणालाही न सांगता शिरवळ या ठिकाणी जाऊन कोरोनाच्या तपासणीसाठी घशाच्या श्रावाचे नमुने दिले . 

    दोनच दिवसात ३१ जुलै रोजी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं मला समजलं.  आणि खरं तर आभाळच कोसळल्या सारखं वाटलं. चार महिन्यात ज्यापासून आपण दूर पळत होतो ते आता आपल्या जवळ पोहचलं होतं . पण हिंमत हरलो नाही . पुढच्या उपचारासाठी पाचगणीला जावे लागेल असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचवलं.  सरकारी गाडीची अपेक्षा न धरता मी माझ्या गाडीने स्वतः गाडी चालवत पाचगणी या ठिकाणी गेलो.  मी तिथे पोहोचण्यापूर्वी माझ्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली होती.  अहिरे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली चिठ्ठी दाखवताच पाचगणी येथील बेललेअर हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले . गेल्यानंतर शेजारीच गजेंद्र मुसळे उपचारासाठी माझ्या अगोदर दाखल झाले होते त्यांची भेट झाली . तेवढचं मनाला दिलासा वाटला .  खरं तर तिथे जेवणाची ,राहण्याची उत्तम सोय होती अन् उपचारही चांगले होते .  साधारणपणे तीन दिवस मी तिथे उपचार घेतले . पण ताप काही कमी होत नव्हता.  खोकलाही वाढला होता,  श्वसनाचा त्रास अधिकच जाणवू लागला. मग मात्र धरणी माय कोपल्यासारखी भासू लागली . आभाळ फाटल्यासारखं वाटू लागलं . यातून आपण बाहेर पडणार का ? अशी अनामिक भीती मनात घर करू लागली होती .  औषधोपचाराचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही हे कळून आल्यावर मी त्याबाबत  तेथील डॉक्टरांना कल्पना दिली .  खरं तर त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला पण श्वसनाचा त्रास अधिक वाढू लागला होता. असहय वेदनांनी जीव घामाघूम होत होता . कोरोनाच्या या विषाणूमुळे आपल्याला चांगलं घेरलं आहे याची जाणीव झाली.  आणि मनामध्ये असंख्य विचारांचं काहूर माजलं .  खरंतर ताप आल्यानंतरचे आजारपण जवळपास दहा दिवस अंगावरच काढल्याचे हे परिणाम होते . शरीरात खूप अशक्तपणा ही जाणवत होता , काय करावे सुचतच नव्हतं.  पुढचा उपचार इथेच घ्यावा की एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी होतो. 

     माझे मित्र महेशनाना यांना पहिला फोन केला आणि मला होणारा त्रासाची त्यांना कल्पना दिली.  त्यानंतर त्याने काळजी करू नका आपण काहीतरी व्यवस्था करू असा नानांनी आधार दिला.  त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोजभाऊ पवार,  डॉक्टर नितीन सावंत , डॉक्टर निंबाळकर, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि आमदार मकरंद पाटील यांनाही त्याची कल्पना दिली.  तातडीने आबांचा फोन आला.  मी आबांना फोनवरच होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली.  खरं तर त्यांनी मानसिक आधारही दिला आणि पुढच्या उपचारासाठी पुण्याला व्यवस्था करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.  माझ्या अगोदर खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनाही उपचारासाठी हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले होते.  त्यामुळे माझी व्यवस्था तेथेच करावी असं मी सुचवलं होतं.  त्याप्रमाणे या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने मला नोबेल हॉस्पिटलला हलवण्याचा निर्णय झाला . 

     शरीरात अशक्तपणा असतानाही पाचगणी पासून  मी स्वतः गाडी चालवत खंडाळा पर्यंत पोहोचलो . परंतु अवस्था खूप बिकट होती . श्वास घेताना त्रास होत होता अशा परिस्थितीत पुण्यापर्यंत गाडी चालवणे मला शक्य होणार नव्हतं.  मग माझ्यासोबत प्रवीण पवार आणि युवराज ढमाळ हे दोघेजण पुण्याला येण्यास तयार झाले .  कोरोनाचा पेशंट म्हटलं की कोणी जवळपासही फिरकत नाही परंतु या दोघांनी आपला जीव धोक्यात घालून माझ्यासोबत येण्याचं ठरवलं.  खरंतर त्यांच्या धैर्याचे कौतुकच करायला हवे .  कृष्णाने लढाईत अर्जुनाचे स्वारथ्य केले . तशी साथ या दोघांनी कोरोनाशी लढताना मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे पर्यंत केली.  त्यांचे धैर्य अफाट म्हणायला हवे .  पुण्यातील नोबेल हॉस्पिटल तसं नावाजलेलं ! मी पोहचल्याबरोबर त्या ठिकाणी आयसीयू मध्ये मला दाखल केले.  गेल्या गेल्या ऑक्सीजन लावण्यात आला होता . पण ताप कमी येत नव्हता , खोकल्याच्या त्रासाने जीव कासावीस व्हायचा .  शरीर थकल्यासारखं वाटतं होतं . खूप त्रास होत होता. तोंडाला चव नव्हती . त्यातच पहिले तीन दिवस तर जेवण गेलं नाही . त्यामुळे आणखी अशक्तपणा वाढला . काय होतंय हे सुचतच नव्हतं.  बीपी सुद्धा वाढला होता.  त्यामुळे आपण पण मरणाच्या विळख्यात आहोत याची पुसटशी जाणीव झाली . " कोरोना काय कुणाला पण होतोय . तपासणी केली की रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय . सगळं बंडलबाज आहे . " असं काहीसं मागील काही दिवसात ऐकलं होतं . परंतु ' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ' या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष वास्तव अनुभव घेत होतो . मनातल्या मनात कोरोनाविषयी गैरसमज पसरविणाऱ्यांची आणि शासनाला दोष देणाऱ्यांची कीव करावी वाटत होती . पण कोरोना खरचं भयानक आहे याचा अनुभव मी घेत होतो . मनातून खूप घाबरलो होतो . कधी कधी अवघा जीवनपट डोळयापुढे तरळून जायचा . जीवनात अनेक संकटांशी आणि पडत्या काळाशी सामना केला पण मनातून कधी खचलो नव्हतो . 'बचेंगे तो और भी लढेंगे ' अशी धारणा नेहमी बाळगली होती .  पण या सर्व प्रकाराने पुरता घाबरलो होतो .  परंतु डॉक्टर खान आणि त्यांच्या सर्व सहकारी परिचारिका यांनी अतिशय उत्तम पद्धतीने माझ्यावर उपचार केलेच पण मानसिक आधारही दिला . जवळपास सात दिवस आयसीयू मध्ये होतो. याकाळात अनेकांचे फोन यायचे ,   त्यामुळे मनाला आधार वाटायचा . 

          माझ्या संपर्कात आलेल्या चोवीस लोकांपैकी चौदा लोकांना कोरोनाची बाधा झाली होती.  यामध्ये माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझी बहीण, दाजी, चुलते यांचाही त्यात समावेश होता. आपण कोरोनाग्रस्त आहोत, उपचारही घेत आहोत अशा परिस्थितीत घरच्यांना बाधा झाल्याचे समजताच खूपच वाईट वाटले.  आता त्यांच्या उपचाराचीही चिंता लागून राहिली . पण स्थानिक प्रशासनातील तहसिलदार दशरथ काळे साहेब , तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . अविनाश पाटील , अहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ . पडळकर , आरोग्य सेवक मानकुमरे यांनी मोलाचे सहकार्य केले . सर्वांना उपचारासाठी स्थलांतरीत करून कोव्हिड हॉस्पीटलला दाखल केले . त्यांना या सगळ्यातून लढण्यासाठी बळ मिळावं एवढाच देवाकडं धावा होता . परंतु आलेल्या संकटाचा सामना करणं एवढंच आपल्या हातात असतं . 

      सात दिवस उपचार घेताना बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क नव्हता केवळ फोनवरून कोणाशी तरी बोलणं व्हायचं.  आयसीयुच्या बाजूलाच एक खिडकी होती. त्या खिडकीच्या तावदानातून बाहेर एक हिरवंगार झाड नजरेस पडायचं. कधीतरी एखादा पक्षी किलबिल करत त्यावर बसायचा आणि माझी नजर त्याकडे जायची . खरंतर ते दृष्य पाहिल्यानंतर मनाला बरं वाटायचं.  तेवढाच काय तो विरंगुळा वाटायचा. त्या झाडाप्रमाणे आपलं जीवन पुन्हा बहरेल . त्या पक्षाप्रमाणे आपणही पुन्हा मुक्तपणे संचार करू असा मनात विश्वास वाटायचा . 

     नोबेल हॉस्पिटल मध्ये बारा दिवस होतो . सात दिवसानंतर मिनी आयसीयूमध्ये मला ठेवण्यात आले. याठिकाणी जवळपास तीन दिवस होतो. आयुष्यात कधीही दवाखान्यात अॅडमिट होण्याचा प्रसंग माझ्यावर आला नव्हता. ही पहिलीच वेळ होती . गेल्या चाळीस वर्षात जेवढी इंजेक्शन आणि औषध मी घेतली नसतील, तेवढी या बारा दिवसात घ्यावी लागली. नुसत्या पोटात पंधरा इंजेक्शन घेतले होते . रोज रक्त तपासणीसाठी घेतले जात होते . इंजेक्शनच्या टोचणीने हातांची चाळण झाली होती . पण सहन करण्यापलिकडे दुसरा मार्ग नव्हता . हळूहळू तब्बेत सुधारत होती . जेवणाचा डबा बहिणीच्या घरुन यायचा . घरच्या जेवणामुळे ताकद वाढत होती . आयसीयू मधून बाहेर पडल्यावर काही दिवस अंडरऑब्जर्वेशन स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले . 

         या संपूर्ण पंधरावड्यात आमदार मकरंद पाटील यांनी वारंवार माझ्याशी फोनवरून संपर्क करून संवाद साधला आधार देण्याचा प्रयत्न केला. तसा घरच्या लोकांचा आणि इतरही मित्रांचा फोन करून आधार देण्याचा प्रयत्न होता .  राजकीय क्षेत्रात असल्याने माझ्या बाबत आस्था असलेल्या तालुक्यातील आणि खेड गणातील पदाधिकाऱ्यांचे आणि राजकारणातील अनेक छोटया मोठया कार्यकर्त्याचेही फोन आले. गावातील सर्वांनीच माझ्यासाठी देवाकडं साकडं घातलं .  कठीण काळात ही मोलाची साथ ठरली.  त्यामुळे आयुष्यात वैरी कुणी असतच नाही याची प्रचिती मला आली.  बारा दिवसाचा उपचार काळ पण तो एका तपासारखा वाटला . कधी एकदा आपल्या माणसांमध्ये जातोय असं वाटायचं अन् मन घरी ओढ घ्यायचं . अखेर १५ ऑगस्ट रोजी माझी दवाखान्यातून सुटका झाली . बाहेरच्या हवेचा मोकळा श्वास घेतला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याची भावना मनात आली . घरी आलो तेव्हा दारातच स्वागत करण्यात आलं . औक्षण करून घराची पायरी चढलो . त्यांच्या प्रेमाने मी पुरता भारावून गेलो . 

      ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय तशी चिंताही वाढते आहे.  एखादी बाधित व्यक्ती हा स्वतःहून कधीही पॉझिटिव्ह येत नाही.  परंतु त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वाईट असल्याचे दिसून येत आहे.  अशा बिकट प्रसंगी एकमेकांना आधार देणे हाच खरा माणुसकी धर्म आहे . परंतु अशा लोकांना वाळीत टाकल्यासारखे वागवले जाते.  खरंतर माझ्याबाबतीत असं मला अजिबात जाणवलं नाही . परंतु ही वस्तुस्थिती आहे.  म्हणूनच समाजाची धारणा बदलली गेली पाहिजे. तसं पाहिलं तर  यापूर्वी आयुष्यात अनेक विधायक कामात हातभार लावला होता. अडल्या नडलेल्यांच्या , दीनदुबळ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केला होता . त्यांचे आशीर्वाद आणि अनेक मित्र जोडले होते त्यांचं बळ आणि घरच्यांचं प्रेम माझ्या पाठीशी होतं . त्याचं फळ म्हणून मला या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडताना आधार दिला.  आयुष्य खूप मोठं आहे पण ते महान बनवण्यासाठी आपली कृती , आचरण महत्त्वाचे असते.  याची जाणीव या काळात निश्चितपणे झाली.  आज कोरोनाशी यशस्वी लढा देऊन पुन्हा समाजात वावरत असताना मनाला आनंद वाटतो. परंतु अशी वेळ कोणावरही येऊ नये असं वाटतं. 

     एक गोष्ट मात्र निश्चित आहे . या लढ्यात जगण्याची इच्छा आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे . एकमेकांना साथ देऊया आणि कोरोनाला हद्दपार करुया ! 


         - सुभाषराव भोसले

            सरपंच ग्रामपंचायत घाटदरे -भोसलेवाडी

[शब्दांकन - दशरथ ननावरे ( श्रीमंत ), खंडाळा ]

Saturday, 22 August 2020

॥ विचारवेध ॥ स्त्री - महिमा

 

॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास- अभ्यासक 

स्त्री -महिमा 


जगाच्या पाठीवर मातृत्व आणि दातृत्व यांचं लेणं होऊन अवतरलेली स्त्री ही महान आहे . 'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ' असं म्हणताना खरोखरच स्त्रियांच्या वाट्याला आज काय आहे. काल स्त्री काय होती याचा विचार मनामध्ये डोकावतो.

        छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता मानलं. इतकी स्त्री श्रेष्ठ होती.  शिवशाहीमध्ये जेव्हा जेव्हा स्त्रियांवर अत्याचार झाले त्या प्रत्येक वेळी राजांनी स्त्रियांना न्याय दिला.  एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला म्हणून रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय तोडून चौरंग्या केला . सरदार गायकवाड यांनी विजयाच्या धुंदीत परस्त्रीशी गैरवर्तन केले म्हणून राजांनी या विजयी सरदाराला शासन केले.  न्यायदान करताना राजांनी कधीही आप्त स्वकीयांचाही मुलाहिजा राखला नाही.  स्त्रियांच्या बरोबर कित्येक प्रसंगी त्यांचा उचित सन्मान करायला ते विसरले नाहीत.  कैद केलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला देखील मानाने वागवले .धाडसी हिरकणीचा ही यथोचित सत्कार केला. लढाईत पराजित झालेल्या सावित्रीबाई देसाई हीला बहिण मानून तीच्या जहागिरीची व्यवस्था लावली .  ही न्यायबुद्धी आणि परस्त्री सहिष्णुता राजांजवळ होती. म्हणूनच शिवस्वराज्य यशस्वी ठरले.

        भारताच्या आजच्या लोकशाहीत स्त्रीला खरंच न्याय उरला आहे का? किरण बेदी सारख्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याला केवळ स्त्रीधर्म म्हणून उच्च पदापासून दूर ठेवले गेले . एकीकडे देशाचे राष्ट्रपती पद एक महिलेने  भूषविले तर दुसरीकडे त्याच देशात अनेक स्त्रिया पुरुष प्रधान संस्कृती खाली भरडल्या जातात.  यासारखा विरोधाभास व शोकांतिका दुसरी नाही.  या देशात कायद्यानुसार कागदावरच स्त्रीला हक्क मिळाले असे खेदाने म्हणावे लागते . कारण आजही प्रत्यक्ष काम करताना अनेक ठिकाणी  पुरुषी अंमल दिसतो.  

     आजवर देशामध्ये अशा असंख्य घटना आहेत जिथं स्त्रीवर अत्याचार घडले. परंतु न्यायालयाच्या दरबारी तिच्या वाट्याला फक्त उपेक्षाच आली.  ज्या स्त्रीच्या पोटी मनुष्यजन्म आहे, त्या स्त्रीला न्याय मिळणे गरजेचे आहे.  सहनशीलतेची जन्मजात देणगी व आपले जीवन ध्येय गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणारी आजची स्त्री सबला करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . स्त्रीच्या करूण कहाणीकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे . घरापासून वेशीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्त्रीला सन्मानाने वागवले जाईल. तेव्हा कुठे लोकशाहीची बीजे समाजात रुजली असं म्हणावं लागेल. नाहीतर पुरुष प्रधान संस्कृती खाली दडपली जाणारी स्त्री समाजात अबलाच दिसून येईल . भारतीय इतिहासात अनेक स्त्रीयांनी आपल्या कर्तत्वाने अजरामर इतिहास रेखाटला . आधुनिक काळात अनेकांनी आपापल्या क्षेत्रात गगनभरारी घेऊन देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे . काळाच्या ओघात हा स्त्री -महिमा अबाधित राखण्यासाठी आणि तीच्या कर्तृत्वाला उंच भरारी घेण्यासाठी पाठबळ देणे आपले कर्तव्य ठरते . 




- दशरथ ननावरे (श्रीमंत )

   इतिहास अभ्यासक

Friday, 21 August 2020

॥ विचारवेध ॥ - विचारांचा मळा

 


॥ विचारवेध ॥ 

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

विचारांचा मळा 


      'विचार आणि आचरण ' ही दोन चाके सत्प्रवृत्तीने चालू लागली तर मनुष्याची गाडी आयुष्याच्या वाटेवर सतत मार्गाने धावते. माणसाचे विचार जेवढे प्रगल्भ असतात, त्यानुसारच त्याचे आचरण आदर्शवत ठरते . मानवाच्या अंगी बानलेल्या सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे त्याच्या अनमोल विचारांची परिसीमा असते. तुम्ही जसा विचार करता तसेच आचरण असते. म्हणूनच चांगले विचार यशाच्या शिखरावर उत्तुंग भरारी मारण्याचा मार्ग आहे.

          "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण "  या उपदेशानुसार मानवाचे मन प्रसन्न असेल तर मनामध्ये चांगल्या विचारांचे अंकुर फुटतात. त्याला सद्गुणांची पालवी फुटते . या विचारांवर मानवाचे श्रेष्ठत्व सिद्ध होत असते . छत्रपती शिवाजी राजांचे राज्य हे एका पूर्ण विधायक विचारांवर आधारित होते . या शिवरायांच्या स्वराज्याचे एकच विचार आजही जनमानसाच्या हृदयसिंहासनावर कोरलेले आहेत . महाराष्ट्रात अशाच विचारांची पेरणी संत सज्जनांनी करून महाराष्ट्राला राकट आणि कणखर बनवण्याचे सत्कार्य केले.  विचारांच्या देवाण-घेवाणीवर समाजाची संस्कृती आधारलेली असते. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी अखिल मानव जातीचे सद्विचार आचरणात आणले पाहिजेत. 

          जगात ज्या ज्या ठिकाणी सामाजिक क्रांती घडली त्याच्या पाठीमागे महत्त्वकांक्षी विचारांची गुंफण होती. एका विचाराच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या महान विभूतिमुळेच भारताला स्वातंत्र्याचा राजमार्ग दिसला . एक व्यक्ती, कुटुंब , समाज, गाव, राज्य आणि देश हे समृद्ध विचारांनी बांधले गेले पाहिजेत . त्यांच्यात चांगले सुसंवाद घडले पाहिजेत तरच देशाच्या उज्ज्वल विकासाची स्वप्न साकारलेली दिसतील. 

        मनुष्याचा स्वभाव हा विचारांवर आधारित असतो . विनाकारण एखाद्या गोष्टीचा अधिक विचार करत बसलो तर मनाला त्याची चिंता लागून राहते. चिंता हा मनाचा असाध्य विकार आहे.  संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे 

       चिता चिंता समानस्ती, बिंदू मात्र विशेषतः

       चिता दहती निर्जीव, चिंता दहती सजीव ॥ 

चिता आणि चिंता या शब्दांमध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे.  परंतु त्याचे परिणाम मात्र भिन्न आहेत.  चिता ही निर्जीव देहाला जाळते तर चिंता ही सजीव देहाला जाळत असते. चिंता करणारा मनुष्य मानसिक विकृती असलेला दिसून येतो.  त्यामुळे जीवनात त्याला सहजासहजी यश सिद्धी प्राप्त होत नाही.  म्हणूनच विचार हा प्रसन्न मनाने करायला हवा म्हणजे तो सत्मार्गावर नेणारा ठरेल. 

          शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले विचार, आईने मुलाला दिलेले विचार, गरूने शिष्यांना दिलेले विचार आणि राजकीय गुरूंनी राज्यकर्त्यांना दिलेले विचार जर उत्कर्ष करणारे असतील तर समाजाची मानसिकता सदृढ राहणार आहे . मनुष्य कोणत्याही जाती-धर्माचा असो, तो एका राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित विचारांशी समरस असायला हवा. कारण राष्ट्रकार्यात हातभार लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  आपण दुसऱ्याबद्दल जसा विचार करतो तसाच विचार इतरही आपल्याबद्दल करत असतात . शेवटी हे विचारच प्रत्येकाला उच्च अधिष्ठान आणि देवपण प्राप्त करून देणारे ठसतात . म्हणूनच समृद्ध विचारांचा मळा प्रत्येकाच्या मनात फुलला पाहिजे. 


 - दशरथ ननावरे (श्रीमंत ) 

   इतिहास अभ्यासक

Monday, 10 August 2020

॥ विचारवेध ॥ स्वातंत्र्याच्या लढयाची चळवळ -ऑगस्ट क्रांती

 

॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहस अभ्यासक 

स्वातंत्र्यलढयाची चळवळ - ऑगस्ट क्रांती 


      इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले . त्यांच्या स्मृतीचा ऐतिहासिक दिन म्हणजे ९ ऑगस्ट क्रांती दिन अर्थात क्रांती दिन !        

      इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला 'भारत छोडो' असे नाव देण्यात आले होते. 'करो या मरो' अशी या आंदोलनाची घोषणा होती. 

       ८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''  ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती.     

      ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.  त्यावेळी, तरुण कार्यकर्त्या अरुणा असिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र, गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे, असे आवाहन देशवासियांना केले होते. 

        तरीही संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. 

     भारतीयांनी पुकारलेला १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर, या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली-सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.  या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.   


        - दशरथ ननावरे ( श्रीमंत )

          इतिहास अभ्यासक








Friday, 7 August 2020

॥ विचारवेध ॥ आई

 

॥ विचारवेध॥  

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

   आई 

      ' न मातु: परम दैवतम I '  आईविना दुसरे दैवत नाही. आई म्हणजे विधात्याला पडलेले सुंदर स्वप्न... असे म्हणतात , ईश्वराला प्रत्येक घरी जाणं शक्य झाले नाही म्हणून त्यांने निर्माण केली आई ! 'आ' म्हणजे आत्मा, ' ई ' म्हणजे ईश्वराचं देणं . आई ही अक्षरे दोनच आहेत. परंतु त्यात ओतप्रोत अर्थ समाविष्ट झाला आहे. मांगल्य,  उदारता , लीनता , सहनशीलता,  त्याग,  सेवा , दातृत्व, क्षमाशीलता ,संयम , शांती , तेजस्विता आणि कर्तव्यतत्परता या सर्वच गुणांचा समावेश तिच्यात आहे. अशा मातांचे मोल समजून तिची पूजा बांधणी प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. 
     आईची मांडी म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ आहे. तिथं जीवनाच शिक्षण असं दिलं जातं की, ते जगाच्या पाठीवर कोणत्याही विद्यापीठात मिळणार नाही . लहानपणापासून बाळाच्या सुखदुःखाची जाणीव मनामध्ये ठेवून त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी,  प्रसंगी स्वतः ओलावा सहन करून बाळाला ऊब देणारी ईश्वरी ममता म्हणजे आई ! 
         'बाळा होऊ कशी उतराई I
         तुझ्यामुळे मी झाले आई ॥ 
अशी भावना सदैव मनामध्ये बाळगणाऱ्या आईचे खरे मोल मुलांनी समजून घेणे यातच तिच्या कष्टांची सार्थकता आहे . 
          छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या मायेच्या छत्राखाली वाढविणारी राजमाता जिजाऊ महाराष्ट्रावर मोगलांच्या रूपाने येणाऱ्या काळावर घाला घालण्यासाठी शिवाजीराजेंसारखा कर्दनकाळ तिने निर्माण केला. राजांनीही जिजाऊंच्या कष्टाची सार्थकता पूर्ण केली.  म्हणूनच राजे थोर व जिजाऊ या वंदनीय राजमाता ! 
     ' स्वामी तिन्ही जगाचा , आई विना भिकारी ' या सुवचनातून आईचे महात्म्य व्यक्त होते . भारतातील अनेक राष्ट्रपुरुषांना देशाच्या सेवेसाठी घडविणारे विचार आणि हात हे एका मातेचे होते . किंबहुना अनेकांना भारत देशालाच आपली माता समजून सेवा केली आजही देशसीमेवर आपले प्राण पणाला लावून लढणारे निधड्या छातीचे सैनिक भारतमातेचे संरक्षण करीत आहेत . आपल्या मातेप्रती असलेली कर्तव्य भावना यातून दिसून येते . जन्म देणारी आई आणि ज्या भूमीत जन्म घेतला ती माता एकसमानच आहे . आपल्या हातून विविधांगी सेवा घडावी यासाठी प्रयत्न करणे एवढं तर आपण निश्चितच करु शकतो . 
        आई हीच अपत्याच्या जीवनाला आकार व वळण देणारी किंबहुना अस्तित्व देणारी , जगण्याला ध्येय , हेतू  व अर्थ देणारी माय माऊली ! म्हणूनच उत्तुंग प्रतिभेच्या मातांमुळे आईची प्रतिमा अभंग आहे .आईचे मूल्य, वृत्ती आणि महात्म्य भावी पिढ्यांसाठी आदर्श ठरावी यासाठी प्रत्येक मुलाने आई विषयीचे कर्तव्य पार पाडायला हवे . आपली मुले हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती मानणाऱ्या आईची शिकवण ही गतिमानतेने बदलणाऱ्या जगताच्या निरंतरतेची खरी गरज आहे . 



- दशरथ ननावरे (श्रीमंत )
   इतिहास अभ्यासक

Monday, 3 August 2020

॥ विचारवेध ॥ अहिरे शाळा - एक बोलकं बालविद्यापीठ




॥ विचारवेध ॥

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

अहिरे प्राथमिक केंद्रशाळा - एक बोलकं बालविद्यापीठ


आनंददायी शिक्षण , बोलक्या भिंती , रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांनी बहरलेली बाग , त्यामध्ये झुलणारे झोपाळे , भव्य क्रीडांगण ,  डिजिटीलायझेशनच्या आधुनिकीकरणासह अस्खलीत इंग्रजी वाचणारी मुले अन्   कोटीपर्यंतच्या संख्या सहजगत्या अवगत झालेली चौथीपर्यंतचे विद्यार्थी आणि त्यांचा चौरस विकास हे सारचं आपल्या कवेत घेऊन शिरपेचात आयएसओ मानांकन झळकवणारी खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक केंद्रशाळा ! शाळेने मिळवलेला हा नावलौकीक सहजासहजी प्राप्त झाला नाही त्यासाठी बाळगली मनाशी जिद्द आणि केलेत अपार कष्ट ! अहिरे शाळेच्या मेहनतीची ही यशोगाथा.....
    बहुजनांना शिक्षणाची कवाडं मोकळी करून देणारे आणि शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या भारतातील आदयस्त्रीशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या खंडाळा तालुक्यातील अहिरे हे गाव तसं मोठं आणि प्रगल्भ . राजकीयदृष्टया तर पुढारलेलं गाव पण मराठी शाळेकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात होतं . पण गावचेच सुपूत्र प्रशांत गंधाले सर यांची बदली या शाळेत झाली योगायोगाने शाळेच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली . त्यानंतर आपल्या गावच्या शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला . शाळेचे परिवर्तन हाच ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली . याबाबत ते सांगतात , ' खरं तर आभाळ फाटलेलं होतं मग सुरुवात कोठून करावी हा यक्ष प्रश्न समोर होता . या ज्ञानमंदीराला कळस चढवायचा होता पण त्यापूर्वी या मंदीरातील देव घडवले पाहिजेत या विचारावर ठाम राहून शाळेतील मुले प्रथम घडविण्यास सुरुवात केली .
        पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाचे अध्यापनाचे नियोजन करून वर्षभर मेहनत घेतली . राज्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिशादर्शक ठरलेल्या सातारा जिल्हयात उगवलेल्या ज्ञानरचनावादी अध्यापनाचे पीक याही शाळेत रुजविण्यात शिक्षकांना यश मिळाले . खरं तर यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली . बौद्धीक क्षमतेबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळ , स्पर्धा , अवांतर वाचन , परिसर सहली अशा विविध उपक्रमांचे आयोजन तर केलेच पण दर शनिवारी दफ्तराविना शाळा हा नाविण्यपूर्ण उपक्रम घेऊन सर्वांचेच लक्ष वेधले . बघता बघता विद्यार्थी चांगलेच तयार झाले . पहिलीतील विद्यार्थ्यांनी वाचलेले जोडशब्द , दुसरीतील मुलांचे संख्याज्ञान, अन् चौथीतील मुलांचे अस्खलित इंग्रजी वाचन व आकलन सगळच कसं अफलातून घडलं .
      शाळेतील विद्यार्थी चमकू लागले पण त्याबरोबर शाळाही झळकली पाहिजे यासाठी प्रयत्न गरजेचे होते . यासाठी खूप कामे नजरेसमोर होती . पण त्यासाठी हवे होते आर्थिक बळ . पण ग्रामीण भागात नेमकं याचीच वाणवा होती . खेडोपाडयातील प्राथमिक शाळांना नवं रुप दयायचं असेल तर लोकसहभाग हा एक मार्ग असतो पण तोही तुटपुंजाच . मग एखादा मोठा वरदहस्त असावा असा मनात विचार येत असतानाच गावचे सूपूत्र रमेश धायगुडे पाटील यांना तालुक्याचे सभापतीपद मिळाले अन् शाळेच्या अडचणीचा मार्ग सुखर वाटू लागला . भौतिक सुविधा पूर्ण करण्याबरोबरच बांधकाम आराखडा तयार करून क्रीडांगण सपाटीकरणाचे काम सुरू केले . यासाठी गावातील तरुणांनी मोठी मदत केली . त्यानंतर स्टेजचे बांधकाम , बागेचे कट्टे , मैदानातील खेळणी , प्रवेशद्वार , वर्गांचं सुशोभिकरण , बागेतील वृक्षारोपण, वर्गातील साऊंड सिस्टीम , ई -लर्निंग प्रोजेक्ट , स्वतंत्र वाचनालय व यशवंत प्रयोगशाळा, अंतर्बाह्य रंगरंगोटी या सर्वच उत्तम प्रतीच्या कामकाजावर कढी करत शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले . आणि पाहता पाहता शाळेचा चेहराच बदलून गेला .
         अवघ्या दोन तीन वर्षात शाळेने घेतलेली गरुडभरारी अचंबित करणारी असली तरी यासाठी शिक्षकांचे अपार कष्ट आहेत हे दुर्लक्षित करून चालणार नाही . क्रांतीज्योतीच्या तालुक्यात अहिरे प्राथमिक शाळेने राबविलेले उपक्रम शैक्षणिक क्षेत्राला झळाळी देणारे तर आहेतच त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांना नवी उभारी घेण्यास प्रेरणादायी आहेत .


॥ विचारवेध ॥ कडजाई - एक आनंदी सहल




॥ विचारवेध ॥

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

कडजाई -  आनंदी सहल 


हरळी हे गाव तसं सहयाद्रीच्या डोंगररांगेच्या कुशीत वसलेलं छोटसं गाव . हिरव्यागार वनराईनं नटलेलं . याच गावच्या पश्चिमेकडे असणाऱ्या उंच डोंगरावर माता कडजाई देवीचं मंदीर आहे . वास्तविक गतवर्षी या मंदीरात जाण्याचा योग आला होता . पण म्हावशी शाळेतील मुलांनीच आग्रह धरला . वर्षा सहल व परिसर भेट हा उपक्रमही घ्यायचा होता मग काय ठरवलं डोंगर यंगून देवीच्या चरणी डोकं टेकवायचं .
     साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास आम्ही मुलांसमवेत निघालो . लहान मुलं वरती चढतील का? याविषयी मनात शंका होती पण त्यांचा उत्साह पाहिला अन् निर्धार पक्का झाला . विशेष बाब म्हणजे शाळा समितीच्या अध्यक्षा दिपाली राऊत आणि सदस्या गौरी राऊत, उर्मिला राऊत यांनीही सहभाग नोंदवला त्यामुळे पालक सोबत असल्याचा आनंद मुलांमध्ये होता .
      डोंगर पायथ्यापर्यंत गाडीनेच पोहोललो . डोंगर पायथ्याला पोहचल्यावर एकदा डोंगराकडे पाहिलं . आणि ' जय शिवाजी, जय भवानीची घोषणा आणि माता कडजाईचा जयघोष करीत नव्या दमानं पाऊल पुढे पडू लागलं . डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर गेल्यावर देवीचं खालचं मंदीर लागलं, थोडा विसावा घेतला . देवीचं दर्शन घेऊन वरच्या मंदिराकडे आगेकूच केलं . खर तरं हा टप्पा थोडा बिकट वाटेचा होता . ही अवघड वाट दमा दमानं चालत होतो मध्येच पाठीमागं वळून पाहिलं . मनात आश्चर्य वाटलं एवढेसे चिमुकले जीव मोठया हिमतीनं वर चढत होते . डोंगराचा शेवटचा टप्पा चढून आम्ही सर्वजण मंदीरात पोहोचलो . डोंगर चढताना इथली झाडं , गवत , रानफुलं ,काटेरी वनस्पती , दगडांचे प्रकार , टेकडी , डोंगर ,डोंगरातले पक्षी , प्राणी, दरी , झरे , ओढा ,तलाव , ढग , धुकं  याविषयी मुलांना माहिती दिली .
        डोंगराच्या मोठया कड्याच्या बाजूला मंदीर उभारण्यात आले होते . कडयावरची देवी म्हणूनच 'कडजाई ' असे संबोधले जात असावे . खर तरं प्रत्येक मंदीरात प्रवेश करताना आधी कासवाचं दर्शन होतं पण इथे मंदीराच्या कडेला असणाऱ्या पाण्याच्या टाक्यात जिवंत कासवाचंच दर्शन घडलं . हे पाणी खंबाटकी घाटातील खामजाई मंदारातील खामटाक्यातून पोहचते असे सांगितले जाते . मंदीरातील घंटेचा निनाद करून गाभाऱ्यात प्रवेश केला देवीचं मनोभावे दर्शन घेतलं .
 इच्छापूर्ती झाल्याचा आनंद झाला . आणि मुलांची इच्छा पूर्ण केल्याचं समाधानही .
       सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला . मुलांनी गाणी , गोष्टी , कविता म्हटल्या . आजचा दिवसच सर्वार्थाने आनंदी आनंद देणारा ठरला . आता परतीचा प्रवास सुरु करणार तेवढयात डोंगरातला वारा अन् पावसाच्या धारा सुरु झाल्या . पावसाच्या शिडकाव्याने अंगावर शहारा आला पण मुलांचा उत्साह दांडगा होता . पावसाने वाटा निसरडया झाल्या होत्या . मुलांना सावधपणाने सावकाश उतरण्याच्या सूचना केल्या . पाऊस कमी झाल्यावर डोंगर उतरायला सुरुवात केली.  तासाच्या उतरणीनंतर पुन्हा  वाट धरुन लेक फ्रंटला पोहोचलो , येथे खेळाचा आनंद मुलांनी लुटला. परीसर सहलीतून मुलांना वेगळा अनुभव घेता आला . आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मात्र वाटलं .
     .............. दशरथ ननावरे ( श्रीमंत )
                     इतिहास- अभ्यासक , व्याख्याते
                       9922815133

॥ विचारवेध ॥ भोसलेवाडीचं अष्टप्रधानमंडळ



॥ विचारवेध ॥

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

भोसलेवाडीचं अष्टप्रधान मंडळ ....


         सहयाद्रीच्या कुशीत आपला थाट रूबाबदारपणे सांभाळत उभ्या असणाऱ्या खंबाटकी घाटाची डोंगररांग पूर्वेकडे तशीच विस्तारलेली आहे . हिरवाई पांघरलेल्या याच डोंगराच्या बाजूला असणारी भोसलेवाडी . इन मीन वीस तीस घरांची ही वाडी तशी घाटदरे गावाची पोटवाडी पण आपले स्वतंत्र अस्तित्व जपलेली . खरं तरं विविध कार्यक्रमांच्या निमिताने वाडीत अनेकदा येणं झालेलं पण आजचा योगायोग काही वेगळाच होता . इथल्या प्राथमिक शाळेत एक दिवसासाठी काम करण्याची ही संधी होती .
       सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत पोहचलो . गावच्या एका बाजूला भवानीमाता मंदिराशेजारीच शाळेची एकमेव टुमदार इमारत होती . व्हरांड्यातच छोट्या कुंडीतील सुंदर बाग . चौथीपर्यंतचे वर्ग अन् विदयार्थी संख्या केवळ आठच . वर्गात शिवरायांचं अष्टप्रधान मंडळच असल्याचा भास झाला . 'गुड मॉर्निंग सर , वेलकम सर ' चिमुकल्यांच्या ओठावरील या गोड शब्दांनी मुलांच्या मनातील आपुलकीची जाणीव झाली . चुणचुणीत , निरागस आणि बोलकी मुलं समोर असली की अध्यापनाला बहर येतो . सुरुवात परिपाठाने झाली . सत्यमं शिवमं सुंदरा ... या सुरबद्ध प्रार्थनेने या ज्ञान मंदिरात वातावरण मंत्रमुग्ध झालं . त्यानंतर सिद्धीला दुकानातून राख्या आणायला सांगितल्या समीरने हळद , कुंकू आणले . वैष्णवीने ओवाळणीचे ताट तयार केले . तीनही मुलांना राखी बांधून रक्षाबंधनाचा छोटेखाणी समारंभ घेतला . मुलांना आनंद वाटला . 'सर , राखी आणायला पैसे दिलेत त्याबद्दल थ्यँक यू ! ' मुलींच्या या बोलण्याने मी अवाक् झालो . एवढयाशा लहान वयात केवढा समजूतदारपणा .  हजेरी घेताना तर गंमतच झाली, तिसरीतील पूजाचं नाव घेतलं तर सिद्धी लगेचचं म्हणाली .सर , ही नेपाळची आहे . हीचे आई बाबा गावचे सरपंच सुभाष आबांच्या घरी कामाला असतात. सर हीच्या मोठया बहिणीचं नाव आरती अन् छोट्या भावाचं नाव प्रसाद असायला पाहिजे होतं . मग आरती , पूजा , प्रसाद असं झालं असतं . किती शब्दांची उकल या मुलांकडे . पहिलीतला गणराज तर खूप बडबडा ... वास्तविक अंगात ताप होता पण बळेच वर्गात बसवून ठेवलेला . अगोबाई , ढग्गोबाई ... कविता त्याने छान म्हटली. 'र ' चा उच्चार 'ल ' होत असल्याने त्याच्या तोंडून आलेले ' वाला वाला गला गला सो सो सूम ' ही ओळ लडीवाळी वाटली . दुसरीतील सर्जा ( समीर ) - राजाची जोडी तुफान होती . मुलांचे वाचन , सुंदर हस्ताक्षरातील लेखन , इंग्रजी वाचन , गणिताचे आकलन , गीत गायन, शाळेची शिस्त सारचं अफलातून होतं . खरं तर एक शिक्षकी शाळा असताना इथली प्रगती पाहता शिक्षकाचे कौतुकच करावे लागेल . त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं पुढे उत्तुंग भरारी घेतील अन् अनेक क्षितीजं पादाक्रांत करतील यात शंका नाही .
     दुपारपर्यंत अध्यापन अन् नंतर मनोरंजक खेळ त्यामुळे मुलांच्या आनंदाला पारावरच उरला नाही . मुलांशी गप्पा मारण्यात दिवस कधी सरला हे कळलं देखील नाही . शाळेची, मुलांची तयारी पाहून भारावून गेलो . वाटलं असं काही आपल्या शाळेत करता आलं तर ... आणि हीच प्रेरणा मनामध्ये देऊन नव्या उमेदीनं घरी परतलो .
                       - दशरथ ननावरे (श्रीमंत )
                         इतिहास- अभ्यासक , व्याख्याते
                         ९९२२८१५१३३

॥ विचारवेध ॥ - रक्षाबंधन




॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

रक्षाबंधन


    भारतीय संस्कृतीमध्ये बहिण भावाच्या नात्याचे अतुट बंधन 'रक्षाबंधन ' सणाच्या निमित्ताने दिसून येते . बहीण भावाचे निस्वार्थी व पवित्र प्रेमाचे हे बंधन आहे . राखी बांधून केवळ स्वसंरक्षणाचा हक्क अबाधित राखणे एवढीच यामागची भावना नसून समस्त स्त्री जातीच्या संरक्षणाची इच्छा यानिमित्ताने ठेवली जाते . म्हणूनच आज प्रत्येक पुरुषाने महिलांचा बाह्यशत्रूपासून आणि अंतर्गत विकारांपासून रक्षण करण्याचा संकल्प करायला हवा .
       पौर्णिमेला पूर्ण चंद्राचे दर्शन होत असल्याने हिंदू वर्षाप्रमाणे पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमा असते त्यावेळी हनुमान जयंती साजरी होते . दुसरी पौर्णिमा बुध्दपौर्णिमा , तिसरी पौर्णिमा वटपौर्णिमा या दिवशी पतीच्या आयुष्याची मनोकामना मागीतली जाते , चौथी पौर्णिमा गुरुपौर्णिमा यादिवशी शिक्षकांना- गुरूला वंदन करण्याची प्रथा आहे , तर पाचवी पौर्णिमा श्रावणातील  नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते . याच दिवशी 'रक्षाबंधन ' सण साजरा केला जातो .
    रक्षाबंधन करण्या पाठीमागे काही पौराणिक , धार्मिक , सामाजिक , ऐतिहासिक घटनांना अनुसरले जाते . पुरानात देव आणि असूर यांच्या संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात रक्षासूत्र बांधले असे वेदात सां‍गितले आहे. श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यानंतर द्रोपदीने साडीची किनार ( जरतारी शेल्याची चिंधी ) बांधले , त्यामुळे कृष्णाने भावाच्या नात्याने द्रोपदीचे रक्षण केले . अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती . इतिहासात चितोडची राणी कर्मावती हिने  हुमायूँला राखी पाठवली होती. त्यानुसार मुघल हुमायूने कर्मावतीचे रक्षण केले . राजपूत स्त्रीया रक्षणासाठी शत्रूच्या हाती रक्षासूत्र बांधत असल्याचे अनेक दाखले आहेत . अगदी अलिकडच्या काळात बंगालच्या विभाजनानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी हिंदू मुस्लिम बंधू भगिनींना एकमेकांना रक्षा सूत्र बांधण्यास सांगितले होते . या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.
      राखीच्या पवित्र धाग्यात आपल्या ध्येयापासून विचलीत न होण्याची शक्ती असते . त्यामुळेच रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक बनते . त्याला स्मरुन प्रत्येक पुरुषाने ध्येयपथावर मार्गक्रमण करावे असा संदेश या पवित्र धाग्यातून मिळतो .
     स्त्री ही पवित्र देव्हाऱ्यातील देवता आहे . महिलांकडे विकृत दृष्टीने न पाहता त्यांच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवली जावी अशी शिकवण भारतीय संस्कृतीमधून मिळते .  आजही समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.  राखी मग तो साधा धागा असो , रंगीबेरंगी धाग्यावर लपेटलेली नक्षी असो , धाग्यात ओवलेले मणी असो , चांदीने मढवलेली राखी असो की सोन्याच्या धाग्याची असो . तो विश्वासाचा धागा बंधनाचे दयोतक आहे . एकाच कुटुंबात बहिण भावाला राखी बांधते . कधी मानलेला भाऊ ( गुरु भाऊ ) असो , की शेजारधर्म पाळताना जपलेले नाते संबंध असो . अगदी अलिकडच्या काळात इंटरनेटद्वारे पाठवलेली राखी असो वा रक्षाबंधनाचा संदेश. बहिण भावाचे नाते अधिक दृढ झाल्याचे दिसून येते . 
     रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता झरा ! पराक्रम , प्रेम , साहस व संयम यांचा पवित्र संगम . या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने दायित्वाची भावना जपून सामाजिक नातं प्रेमळ , सहिष्णू , सामंज्यसाचे आणि परस्पर विश्वासाचे बनवूया . तरच हा उत्सव भारतीय संस्कृतीचं अनमोल ठेवा बनेल .

- दशरथ ननावरे ( श्रीमंत )
  इतिहास - अभ्यासक